प्रतिनिधी/ रत्नागिरी
गेल्या महिनाभरापासून संपाचे हत्यार उगारलेल्या एसटी कर्मचाऱयांच्या एकजुटीमध्ये रत्नागिरी जिल्ह्य़ात फूट पडल्याचा प्रत्यय येत आहे. जिल्हय़ात 4 हजार 271 पैकी 483 कर्मचारी सेवेत पुन्हा रुजू झाले आहेत. सुमारे 10 टक्के कर्मचारी सेवेत पुन्हा कार्यरत झाल्याने बुधवारी 168 फेऱया जिल्हय़ातील विविध मार्गावर धावू लागल्याचे सांगण्यात आले.
एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱयांचे आंदोलन आजही सुरू आहे. उच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीच्या अहवालानंतर विलीनीकरणाचा निर्णय होईल. मात्र त्यापूर्वी सरकारने कर्मचाऱयांच्या पगारात वाढ करत संप मागे घेण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला कर्मचाऱयांनी प्रतिसाद न दिल्यास त्यांच्यावर कारवाईचा इशारा परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिला होता. मात्र याला न जुमानता अनेक कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत. सरकार न्याय देत नाही, तोपर्यंत संपातून माघार घेणार नसल्याचा पवित्रा कर्मचाऱयांकडून घेण्यात आला आहे. मात्र शासनाने पगारवाढीचा निर्णय जाहीर केल्यानंतर या आंदोलनात राज्यस्तरावर फूट पडली. त्याचे पडसाद रत्नागिरी जिल्हास्तरावरही दिसून येत आहेत.
सध्या कर्मचाऱयांचे आंदोलन संघटनाविरहित आहे. त्यामुळे आंदोलनाचे नेतृत्व व शासनाकडून कारवाईचा इशारा यामुळे कर्मचाऱयांमध्ये संभ्रम आहे. अनेक कर्मचाऱयांनी सेवेत पुन्हा कार्यरत होण्याचे पाऊल उचलले आहे. तरीही मंडणगड, रत्नागिरी डेपोतील कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत. या दोन्ही डेपोतील एकही कर्मचारी हजर झालेला नाही. हे दोन डेपो वगळता उर्वरित डेपोतून एसटीची वाहतूक सुरु झाली आहे. जिल्हाभरात तब्बल 483 कर्मचारी पुन्हा सेवेत रुजू झाले आहेत.
रत्नागिरी, मंडणगडमधील सेवा ठप्पच
मंडणगड व रत्नागिरी डेपोतील कर्मचारी आंदोलनावर ठाम असून या दोन्ही डेपोतील एकही कर्मचारी कामावर हजर झालेला नाही. त्याचा परिणाम म्हणून या दोन्ही तालुक्यातील एसटीची सेवा ठप्पच आहे. सर्वसामान्य ग्रामस्थांना याचा मोठा फटका बसत आहे. आता सर्व शाळाही सुरू झाल्याने विद्यार्थीवर्गासमोरही एसटीविना शाळांमध्ये जाण्याचा प्रश्न उभा आहे.
देवरुख डेपोची एकच बस सुरू
साखरपा ः देवरुख डेपोच्या अखत्यारित असणाऱया साखरपा बसस्थानकात कर्मचायांच्या संपामुळे गजबजलेले स्थानक शांत झाले आहे. या ठिकाणी दिवसाच्या अनेक फेऱया सुरू असतात. मात्र संपामुळे या बसस्थानकात शांतता दिसत आहे. आतापर्यंत देवरुख-साखरपा ही एकमेव फेरी या स्थानकातून सुरू आहे. त्याचप्रमाणे आंबा घाटातून एसटी वाहतूक बंद असल्याने पश्चिम महाराष्ट्रात सुरू असणाऱया फेऱया बंद आहेत.
या स्थानकातून मुंबईला जाणाऱया अनेक फेऱया असतात, मात्र संपामुळे बंद आहेत. याचा फायदा खासगी बसवाहकांना होत आहे. साखरपा गावातून रोजच्या 10 ते 15 ट्रव्हल्स साखरपा-मुंबई मार्गावर फिरत आहेत. येथे त्यांनी कोणतेही भाडेवाढ केल्याची घटना घडली नसल्याचे चित्र आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. बाजारपेठेत तुरळक प्रमाणात नागरिक येत असल्याने दुकानदारांच्या व्यवसायावर परिणाम होत आहे. त्यामुळे लवकर एसटी बस सेवा पूर्ववत व्हावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे.