प्रतिनिधी / सातारा :
एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. या संपात सातारा आगारासह जिल्ह्यातील 11 आगार सहभागी झाले होते. दरम्यान, या आंदोलनामुळे प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली. एसटी बंद असल्याचा गैरफायदा खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वडाप चालकांनी घेतला अन् दिवाळी साजरी केली.
जिल्ह्यातील सातारा, वाई, फलटण, पाटण, कराड, मेढा, दहिवडी, वडूज, कोरेगाव, महाबळेश्वर, खंडाळा अशा अकरा आगारामध्ये सकाळपासूनच काम बंद आंदोलनात कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला होता. प्रत्येक आगारातील कर्मचाऱ्यांनी आगारात, विभागीय कार्यालयासमोर आंदोलन केले. जोरदार घोषणाबाजी करुन निषेध नोंदवण्यात आला.
दुपारी 3 वाजेपर्यंत 30 लाखांचा तोटा
बंद ठेवण्यात आलेल्या एसटी बसमुळे जिल्ह्यात दुपारी 745 फेऱ्या रद्द करण्यात आल्या. 98 हजार 757 किलोमीटरवरील मार्गिंका बंद होत्या. त्याचे 30 लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले होते. तर सांयकाळी उशीरापर्यंत 50 लाखापर्यंतचे उत्पन्न बुडाले होते.