प्रतिनिधी / सातारा :
“लढा न्याय हक्काचा..लढा स्वाभिमानाचा.. लढा आत्मसन्मानाचा..”अशी घोषणा देत सर्व एसटी कर्मचारी संघटनांनी आपल्या गटातटाचे राजकारण बाजूला ठेवून राज्यात सुरु केलेले राज्यव्यापी काम बंद आंदोलन सातारा विभागामध्ये रविवारीही कडकडीत सुरु होते.
सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात कर्मचाऱ्यांचे शपथपत्र सादर करण्यासाठी सातारा विभागात रविवारी कर्मचाऱ्यांची लगबग सुरु होती. एसटी महामंडळाचे शासनामध्ये विलगीकरण झाले पाहिजे, असा उल्लेख करुन प्रत्येक कर्मचारी शंभर रुपयांच्या स्टॅम्पवर शपथपत्र सादर करणार आहे. त्याकरता वर्गणी गोळा करण्याचे काम सुरु होते.
एसटीचा संप चिघळतच चालला आहे. राज्य सरकारकडून एसटीच्या कर्मचाऱ्यांवर कारवाईंचा बडगा उगारला गेला आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी थेट संपावर गेलेल्या एसटी कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. त्यानुसार सातारा विभागातील फक्त फलटण आगारातील चार कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे. दरम्यान, सातारा आगारासह इतर सर्वच आगारात आता निलंबनाची कारवाई जर अधिकाऱ्यांनी केली तर अधिकाऱ्यांना सातारचे पाणी दाखवू, असा इशाराच साताऱ्याच्या लोकप्रतिनिधींनी दिल्याने अधिकारीही आंदोलनकर्त्यांच्या सोबत आहेत. दरम्यान, सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात एसटी कर्मचारी स्वतःचे शपथपत्र सादर करणार आहेत.