प्रतिनिधी / कोल्हापूर
एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप आता चिघळण्याच्या मार्गावर आहे. राज्य सरकारने नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीमध्ये एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलिनीकरणाचा कोणताच प्रस्ताव नाही. ही आमची फसवणूक आहे, अशा संतप्त भावना मंगळवारी आंदोलनास बसलेल्या एसटी कर्मचाऱयांनी व्यक्त केल्या. जोपर्यंत राज्य सरकारमध्ये एसटीचे विलिनीकरण होणार नाही तोपर्यंत कर्मचारी मागे हटणार नाहीत, अशी ठाम भूमिकाही त्यांनी सांगितली. तसेच आज, बुधवार (दि.10) रोजी आमच्या मागण्यांसाठी मंत्रालयावर धडक मोर्चा काढला जाणार असून, जिह्यातील एसटी कर्मचारी या मोर्चात सामील होणार आहेत.
सर्व कर्मचारी आज आझाद मैदानावर जमणार असून, तेथून हा मोर्चा मंत्रालयाकडे जाणार आहे. तेथे परिवहनमंत्री अनिल परब यांच्याकडे कामगार आपल्या भावना व्यक्त करणार आहेत. या मेर्चात भाजपचे गोपीचंद पडवळकर, माजी मंत्री सदाभाऊ खोत हेही सहभागी होणार आहेत.
दरम्यान, संपाच्या दुसऱया दिवशी कोल्हापूर जिह्यातील सर्व बारा डेपो ठप्प होते. या डेपोमधून एकही फेरी बाहेर पडलेली नाही. सोमवारी कागल, गडहिंग्लज, गारगोटी या डेपोनी संपात सहभाग घेतला नव्हता. मात्र संपाला वाढता पाठिंबा बघता मंगळवारी या डेपोंनी संपात सहभाग नोंदवला. सोमवारपासून संपास सुरुवात झाली असली तरी सरकारकडून कोणत्याही प्रतिनिधींनी याची दखल घेतलेली नाही, अशी खंतही कर्मचाऱयांनी बोलून दाखविली. आंदोलनस्थळी बहुजन विकास आघाडीने पाठिंबा दर्शविला.
आमच्याच वाट्याला का ?
राज्यातील इतर महामंडळे राज्य सरकारमध्ये सामील करताना कोणत्या समित्या नेमल्या होत्या? मग एसटीलाच का?, आमच्याच वाटÎाला का…असा नाराजगीचा सूर कर्मचाऱयांमधून व्यक्त झाला. आमदारांचे पगार वाढवले जातात, मग आमचे का नाही, असा सवालही त्यांनी विचारला. एसटीकडून 17.5 टक्के प्रवासी कर जमा होतो. राज्य सरकारमध्ये आम्हाला सामील करून घेतले कर हा पैसा सरकारच्या तिजोरीत जमा होईल, असा आशावादही कर्मचाऱयांनी व्यक्त केला.
लांब पल्ल्याच्या प्रवाशांची कुचंबणा
एसटीच्या संपामुळे सामान्य प्रवासीवर्गाला याचा मोठा फटका बसला आहे. सोमवारी लांब पल्ल्याच्या खासगी बसचालकांनी प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडेआकारणी केली होती. तीच परिस्थिती मंगळवारीही पाहायला मिळाली.