खाजगीकरण नको, विलिनीकरण करावे ही मुख्य मागणी
कोल्हापूर प्रतिनिधी
गेल्या तीन महीन्यापासून एसटी कर्मचाऱयांचा संप सुरू आहे. एसटीचे विलिनीकरण करून, या संपामध्ये मार्ग काढावा या मागणीसाठी सोमवारी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. मध्यवर्ती बसस्थानक परिसरातून काढलेल्या या मोर्चामध्ये एसटीच्या कोल्हापूर बारा आगारामधील कर्मचारी व कुटुंबिय सहभागी झाले होते. जनतेच्या हिताची एसटी सेवा मोडून काढून खाजगीकरण करण्याचा डाव राज्य सरकारकडून सुरू आहे. याबाबत एसटी महामंडळाच्या विलिनीकरणासाठी धोरण जाहीर करावे या प्रमुख मागणीसाठी हा भव्य मोर्चा काढण्यात आला. स्टेशन रोडवरून असेंब्ली रोडवरून जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोंर्चा आला. जनतेची एसटी वाचली पाहीजे यासह विविध मागण्यासह घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दूमदूमून गेला.
एसटीची सेवा ही सुरक्षित असून, विद्यार्थी, वृध्द, तसेच अनेकांना सवलत दिली जात आहे. एसटीपासून राज्य सरकारला विविध कराव्दारे मोठे उत्पन्न मिळत आहे. असे असताना एसटी तोटयात असल्याचे चित्र सरकारकडून रंगवले जात आहे. जनतेची एसटी मोडीत काढण्याचे धोरण राज्य सरकारकडून सुरू आहे. कर्मचाऱ्यांना पेन्शसह इतर सुविधेपासून वंचित ठेवण्यात आले आहे. याला आमचा विरोध असल्याने एसटी कर्मचारी आता रस्त्यावर उतरले आहेत. कर्मचाऱ्यांच्या विलिनीकरण भूमिकेला कृती समितीने पाठींबा दिला आहे.
एस टी दीर्घकाल बंद असल्यामुळे एसटी मोडीत जाऊन, खाजगीकरणाची भिती व्यक्त होत आहे. प्रश्न सोडवण्याऐवजी सरकार संपकरी कर्मचाऱ्यावर कारवाईचा बडगा काढत आहे हे धोरण अत्यंत चुकीचे व असंतोष वाढवणारे असल्याने जनतेचे हाल होत आहे.