सातारा / प्रतिनिधी :
कोरोनामुळे एसटी कर्मचाऱ्यांवर आफत आली आहे. सातारा विभागातील साडे पाच हजार कर्मचाऱ्यांना दर महिन्याच्या सात तारखेला जवळपास 6 कोटी रुपये वेतनापोटी दिले जातात. या महिन्यात 18 तारीख आली तरीही त्यांचे पगार झाले नाहीत. एसटीचे कर्मचारी खासगी सावकारांकडून कर्ज घेवून घरसंसार चालवत आहेत. एरवी कामगारांच्या प्रश्नांवर एसटीच्या संघटना आवाज उठवतात, परंतु सर्वच कामगारांना वेतन वेळेवर नसल्याच्या मुद्यावर एसटीच्या सर्वच कर्मचारी संघटना चिडीचुप्प आहेत.
कोरोनाच्या काळात एसटीच्या कर्मचाऱ्यांनी चांगले काम केले. अगदी मुंबईमध्ये जावून मुंबईकरांना सेवा दिली. पहिल्या लॉकडाऊनमध्ये परप्रांतिय कामगारांना त्यांच्या राज्यात सोडण्यासाठी दोन-दोन सलग दिवस ड्रायव्हिंग करुन सेवा दिली आहे. एवढेच नाही तर जिल्ह्यातील रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता होती, ती भरुन काढण्यासाठी बाहेरच्या राज्यातून टँकरचे ड्रायव्हिंग एसटीच्या चालकांनी केले. असे असताना गेल्या तीन महिन्यापासून एसटीच्या कर्मचाऱ्यांचे वेतन हे दि. 7 ऐवजी 20 तारखेनंतर होत आहे. त्यामुळे आधीच पिचलेला तुटपुंज्या वेतनावर काम करत असलेला कर्मचारी आपल्या कुटुंबाची गुजराण करण्यासाठी खासगी सावकारांकडून हातउसणे पैसे घेवून कसेबसे जगतो आहे. त्यातच महिन्यांच्या सात तारखेला मिळणारा पगार उशीरा होत असल्याने त्याचीही वेळेवर देणी भागवता येत नाही. असे असताना कामगार संघटना गप्प का? असा प्रश्न एसटीतील कर्मचाऱ्यांना पडला आहे.