तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
एसटी महामंडळातील परिपत्रकान्वये दिलेल्या सूचना १९९६-२००० या कामगार करारातील कलम २२-१(ब) मधील तरतुदीनुसार चालक/वाहक/ सहाय्यक(मदतनीस) / प्रमुख यांत्रिकांच्या श्रेणी खालील सर्व कार्यशाळा कर्मचारी तसेच सहाय्यक वाहतूक निरीक्षकांच्या श्रेणी खालील सर्व वाहतूक कर्मचारी यांना प्रत्येक कॅलेंडर वर्षात ४० दिवस पगारी रजा (अर्जित रजा) देताना संबंधित प्रवर्गातील कर्मचाऱ्यांनी कर्तव्यार्थ व्यतीत केलेल्या कालावधीसाठी ०९ दिवसाला ०१ दिवस याप्रमाणे वर्षाला ४०(५/९) दिवस रजा जमा करण्यात येत होती. म्हणजेच प्रत्यक्षात ५/९ इतक्या पगारी रजेची जादा परीनीती होत असल्याबाबत लेखाआक्षेप अंकेषण अधिकारी यांनी उपस्थित केल्यामुळे व त्यातून मार्ग काढण्याच्या दृष्टीने अर्जित रजा परीगणनेच्या पद्धतीत बदल करून ४० दिवस अर्जित (पगारी) रजा परिगणित करण्यासाठी पूर्ण वर्षाला चाळीस दिवस याप्रमाणे प्रत्येक महिन्याला ४०/१२=३.३४ याप्रमाणे अर्जित रजा जमा करण्यात यावी म्हणजेच वर्षाला अर्जित रजा ४० दिवसापेक्षा जास्त रजा होणार नाही. अशा सूचना दिलेल्या आहेत व या सूचनांची अंमलबजावणी १ जानेवारी २०१४ पासून करण्यात यावी अशाही सूचना दिलेल्या आहेत.
सन १९९६-२००० मधील कामगार करारातील कलम २२-१(ब) मधील तरतुदीनुसार कामगारांना दरवर्षी देण्यात येणाऱ्या ४० दिवस पगारी रजेपैकी निम्मी रजा कामगारांनी दरवर्षी मंदीच्या मोसमात घेण्याच्या तरतुदीची अंमलबजावणी सन २००५ पर्यंत झालेली नाही. तसेच संदर्भीय क्रमांक ०२ च्या परिपत्रकांमध्ये सदर तरतुदीची अंमलबजावणी करण्याबाबतही उल्लेख नाही. त्यामुळे या तरतुदीची अंमलबजावणी जून २०२० पर्यंत झालेली नाही. सदर तरतुदीच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे काही बाबी स्पष्ट करण्यात येत आहेत.
सन १९९६-२००० च्या कामगार करारातील सदरची तरतुदी अंमलात येण्यापूर्वी महामंडळामध्ये गर्दीचा मोसम व मंदीचा पावसाळी मोसम अशी दोन वेगवेगळी वेळापत्रके तयार केली जात होती. मंदीच्या (पावसाळी) वेळापत्रक तयार करताना बरीच नियते कमी केली जात असल्यामुळे या कालावधीत अनेक कामगारांना कामगिरी मिळत नव्हती. त्यामुळे कामगार कपात केली जात होती व कामगारांचे आर्थिक नुकसान होत होते. म्हणून कोणत्याही कामगारांचे आर्थिक नुकसान होऊ नये व मंदीच्या मोसमातही कामगार कपात न होता सर्व कामगारांना कामगिरी मिळावी, म्हणूनच वर्षाला कामगारांना देय होणाऱ्या ४० दिवस अर्जित रजेपैकी निम्मी रजा या कालावधीत कामगारांनी घेण्याची तरतूद केलेली होती. सदरच्या तरतूदची अंमलबजावणी सन २००४ पर्यंत झालेली आहे. सन २००४ मध्ये शासन मान्यतेनंतर महामंडळामध्ये सुधारित कर्मचारी मंजुरी (स्टाफ की) अंमलात आणली. सुधारित मंजुरीमुळे कामगारांची संख्याही कमी झाली. त्यामुळे पावसाळी मोसमामध्ये चालविण्यात येणाऱ्या नियताप्रमाणे कामगारांची संख्या असल्यामुळे वरील तरतुदीची अंमलबजावणी महामंडळामध्ये सन २००५ पासून २८ जून २०२० पर्यंत झालेली नाही. हे आपणास ज्ञातच आहे. असे असताना परिपत्रकामध्ये सन २०१४ मधील संदर्भीय परिपत्रकातील सूत्रांची अंमलबजावणी करावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याच्या सूचना आपल्या खात्याकडून प्रसारित झाल्यामुळे व परिपत्रकातील कोणत्या मुद्द्यांची अंमलबजावणी करावी याबाबत स्पष्ट उल्लेख नाही. त्यामुळे याबाबत स्थानिक पातळीवर कामगारांकडून ४० दिवसांपैकी २० दिवस अर्जित रजा घेण्याची सक्ती केली जात आहे. तर काही विभागांनी २० दिवस अर्जित रजा घेण्यासाठी अनेक कामगारांच्या नावानिशी आदेश प्रसारीत केलेले आहेत हे योग्य नाही.
आपले लक्ष सन २०१२ ते २०१६ या कामगार करारातील कलम ५५ व त्या अनुषंगाने वाहतूक खात्याने प्रसारित केलेल्या २३ जानेवारी २०१४ कडे वेधण्यात येत आहे. सदर तरतुदीनुसार संचारबंदी, नैसर्गिक आपत्ती, बंद, सार्वजनिक आंदोलने अशा प्रसंगी प्रशासनाने प्रवासी वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला असेल,अशावेळी चालक-वाहकांना त्या दिवसाची हजेरी देण्यात येईल असे मान्य केलेले आहे. परंतु सदर तरतुदीची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केली जात आहे.
कोरोनाच्या अनुषंगाने महामंडळाची बरीचशी प्रवासी वाहतूक बंद असल्यामुळे या कालावधीत सन १९९६-२००० या कामगार करारातील तरतुदीनुसार कार्यवाही करण्याची कामगारांना सक्ती करू नये. तसेच सन २०१२ ते २०१६ च्या कामगार करारातील कलम ५५ च्या तरतूदीची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. वरील सर्व बाबी विचारात घेऊन आपल्या खात्याकडून यासंबंधात स्पष्ट सूचना प्रसारित करण्यात याव्यात म्हणजे याबाबत स्थानिक पातळीवर अंमलबजावणी करताना अडचणी येणार नाही ही विनंती.