ऑनलाईन टीम / मुंबई :
जगात थैमान घालत असलेला कोरोना व्हायरस भारतात देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर देशात लॉक डाऊन जाहीर करण्यात आले आहे. या लॉक डाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये डॉक्टर, नर्सेस, साफ- सफाई कामगार, पोलीस,औषध विक्रेते आणि यांच्या बरोबरच एसटीचे कर्मचारी देखील आपला जीव धोक्यात घालून रात्रंदिवस काम करत आहेत. त्यांच्या कार्याला प्रोत्साहन म्हणून त्यांना दररोज तीनशे रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यात येईल अशी घोषणा परिवहमंत्री व एस टी महामंडळाचे अध्यक्ष ऍड. अनिल परब यांनी केली.
परब म्हणाले, 23 मार्च पासून लॉक डाऊन जाहीर करण्यात आले. या काळात अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या. या अत्यावशयक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची ने – आण करण्याची जबाबदारी सरकारने एसटी महामंडळावर सोपवली. ही जबाबदारी एसटी कर्मचाऱ्यांनी यशस्वी पणे पार पाडत आहेत.
तसेच महामंडळाकडून देखील या कर्मचाऱ्यांची व्यवस्थित काळजी घेतली जात आहे. जे कर्मचारी मुंबई बाहेर राहणारे आहेत, त्यांच्या राहण्याची, जेवणाची तसेच त्यांच्या आरोग्याची काळजी व्यवस्थित व नियमितपणे घेतली जात आहे, असेही परब यांनी यावेळी सांगितले.