वार्ताहर/ टाळसुरे
दापोली एसटी बसस्थानकात चालक व वाहकांना प्रवाशांकडून धक्काबुक्की झाल्याचा प्रकार गुरुवारी रात्री घडला. या बाबत रत्नागिरी आरटीओ अधिकारी प्रदीप बनसोडे यांनी दापोली पोलीस स्थानकात तक्रार दिली.
आरटीओ अधिकारी बनसोडे रात्री दापोली बसस्थानकापासून 200 मीटरच्या आत उभ्या असणाऱया खासगी बसेसवर कारवाई करत होते. यातील काही गाडय़ा त्यांनी दापोली बसस्थानकात आणून उभ्या केल्या होत्या. या खासगी बसेसमधून मुंबईला निघालेले प्रवासी होते. त्या सर्वांना बनसोडे यांनी दापोली बसस्थानकात उतरवले. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात गाडय़ा बसस्थानकात आणून उभ्या केल्याने व प्रवाशांची गर्दी वाढल्याने प्रथम कोणाला काय झाले, हे समजेना. मात्र यानंतर बनसोडे यांनी दापोली आगारातील अधिकाऱयांना खासगी बसमधून प्रवास करणाऱया व गाडीतून खाली उतरवलेल्या लोकांची मुंबईला जाण्याची व्यवस्था करावी, अशी विनंती केली. यानुसार दापोली आगाराने मुंबईला जाण्यासाठी अतिरिक्त गाडय़ा बसस्थानकात उभ्या केल्या. मात्र त्यांची संख्या अपुरी असल्याने प्रवाशांची बसमध्ये जागा मिळवण्यासाठी झुंबड उडाली. यातच बनसोडे यांनी एसटीच्या चालक व वाहकांना एसटीत बसलेल्या प्रवाशांची नावे व मोबाईल नंबर लिहून घेण्याचे आदेश दिले. यानुसार एसटी कर्मचारी विकास मस्के व अमोल मानवतकर खासगी बसमधून उतरून एसटी बसमध्ये बसलेल्या प्रवाशांची माहिती लिहून घेत होते. यावेळी काही प्रवाशांनी आपण नंबर देणार नाही, हे एसटीच्या नियमात बसत नाही, असा पवित्रा घेतला. यावरून मतभेद होऊन मस्के व मानवतकर यांना काही प्रवाशांकडून धक्काबुक्की करण्यात आली.
खासगी बसेस बसस्थानकापासून 200 मीटरच्या आत असल्याने त्यांना आपण दापोली बसस्थानकात आणून उभे केल्याचे बनसोडे यांनी पत्रकारांना सांगितले. यावर खासगी बस मालकांनी बसेस 200 मीटरच्या बाहेर उभ्या होत्या व तेथेच रोज उभ्या असतात. त्यांच्यावर आजपर्यंत कोणतीही कारवाई झाली नव्हती, हे निदर्शनास आणून दिले. यानंतर बनसोडे यांनी एक गाडी वगळता सर्व गाडय़ा कागदपत्रांसह संबंधित मालकांच्या ताब्यात दिल्या. मात्र तोपर्यंत काही प्रवासी एसटीने रवाना झाले होते. काही प्रवासी पुन्हा खासगी गाडीने मुंबईकडे रवाना झाले. हा सर्व गदारोळ मध्यरात्रीपर्यंत सुरू होता. तो संपल्यानंतर बनसोडे यांनी मस्के व मानवतकर या एसटी कर्मचाऱयांना धक्काबुक्की झाल्याप्रकरणी दापोली पोलीस स्थानकात जाऊन फिर्याद दिली. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश तडवी करत आहेत.
प्रवाशांची झुंबड
प्रवाशांचा गदारोळ सुरू झाल्यानंतर एसटीचे अधिकारी बसस्थानकात हजर झाले. त्यांना प्रदीप बनसोडे यांनी मुंबई, विरार व ठाणेसाठी गाडय़ा उपलब्ध करून देण्यास सांगितले. यावर एसटी अधिकाऱयांनी प्रवाशांची एकूण संख्या, मुंबई, ठाणे व विरारसाठी संख्या विचारली. मात्र प्रवाशांची नोंद बनसोडे यांच्याकडे नसल्याने नियोजनाबाबत एकमत झाले नाही. यामुळे बसस्थानकात उभ्या केलेल्या सर्व गाडय़ांमध्ये प्रवाशांची झुंबड होती. यात प्रवाशांचे मध्यरात्री विनाकारण हाल झाले.