शिवडाव हायस्कूलचा अनोखा कौतुकास्पद उपक्रम : शिक्षक नजीकच्या गावात वाडीवार करताहेत ज्ञानदान
कणकवली:
एसटीच्या संपाचा फटका ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बसला आहे. शाळेत जाण्यासाठी एसटीवर अवलंबून असलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. हे नुकसान टाळण्यासाठी शिवडाव सेवा संघ, मुंबई संचलित शिवडाव हायस्कूलने हळवल व वागदेत वाडीवार पाचवी ते दहावीचे वर्ग सुरू करून हायस्कूलचे शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य करत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना घरानजीक शिक्षण मिळत आहे. जोपर्यंत एसटी सुरू होत नाही, तोपर्यंत वर्ग सुरू ठेवण्याचा निर्धार शिक्षकांनी केला आहे. शिवडाव हायस्कूलच्या अभिनव उपक्रमाचे पालक वर्गातून कौतूक होत आहे. हायस्कूलचा हा उपक्रम स्तुत्य असून तो सर्वांसाठी आदर्शवत ठरला आहे.
कोरोनामुळे दीड वर्षांहून अधिक काळ शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. हे नुकसान टाळण्यासाठी ऑनलाईनद्वारे शिक्षकांकडून शिक्षण दिले जात होते. कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर 4 ऑक्टोबरपासून ग्रामीण भागात पाचवी ते बारावीपर्यंतचे, तर शहरी भागात आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली होती. त्यानुसार हे वर्ग सुरू झाले आहेत.
मात्र, एसटी संपामुळे ग्रामीण भागातील ‘लालपरी’ची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. एसटीअभावी लांब पल्ल्यांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना ये-जा करणे अशक्य झाल्याने त्यांच्या शिक्षणाला ब्रेक लागला आहे. शिवडाव हायस्कूलने या परिस्थितीवर मार्ग शोधून काढून हळवल व वागदे परिसरात पाचवी ते दहावीचे वर्ग सुरू करून शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञानार्थी बनविण्याचे कार्य करत आहेत. हायस्कूलच्या अभिनव शैक्षणिक उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना घर परिसरात शिक्षण मिळत असल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान टळून खऱया अर्थाने ज्ञानगंगा घरोघरी पोहोचत असून ‘इच्छा असेल, तर मार्ग सापडतो’ हे शिवडाव हायस्कूलने दाखवून दिले आहे.
पालकांकडून कौतुक
शिवडाव हायस्कूलमध्ये वागदे व हळवल येथील अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, एसटीच्या संपामुळे व खासगी वाहनांच्या भरमसाट प्रवास दरामुळे विद्यार्थ्यांना शाळा गाठणे कठीण होऊन बसले आहे. अशा परिस्थितीत शिवडाव हायस्कूलने वाडीवार वर्ग सुरू करून केलेल्या उपक्रमाचे पालक वर्गातून कौतूक होत आहे. शिवडाव हायस्कूलचे शिक्षक श्रीकृष्ण गावडे म्हणतात, या उपक्रमामुळे एसटीअभावी विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टळणार आहे. जोपर्यंत एसटी सेवा पूर्ववत होत नाही, तोपर्यंत वाडीवार वर्ग घेऊन विद्यार्थ्यांना ज्ञानदान करणार आहोत.