प्रतिनिधी/ रत्नागिरी
एसटीचे कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीसाठी आंदोलनाच्या भूमिकेवर आजही ताठर राहिले आहेत. सरकारने कामावर हजर होण्याच्या केलेल्या आवाहनाला आजही या कर्मचाऱयांनी जुमानलेले नाही. राज्य सरकार पर्यायी चालक उभे करुन एसटीची सेवा पूर्ववत करण्याच्या तयारीत असून निवृत्त चालक तसेच पुरवठादार संस्थांकडून चालकांची करार पद्धतीवर भरती केली जाणार आहे. त्यामुळे आता आंदोलनात सहभागी झालेल्या चालकांच्या भूमिकेवर सरकार काय निर्णय घेणार, याकडे लक्ष वेधले आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात सेवानिवृत्त चालक, स्वेच्छानिवृत्त झालेल्या माजी चालकांना तसेच पुरवठादार संस्थांकडून चालकांची करार पद्धतीवर भरती केली जाणार आहे. त्यासाठी जाहिरातही प्रसिध्द करण्यात आली आहे. एसटी कर्मचारी संपावर ठाम असल्याने एसटीची सेवा अजूनही पूर्वपदावर आलेली नाही. 9 नोव्हेंबरपासून विलिनीकरणाच्या मागणीसाठी सुरू असलेले आंदोलन अजूनही मागे घेतलेले नाही. या आंदोलनाला सुरुवातीपासून भाजपा आमदारांनी याला पाठिंबा दिला. त्यानंतर भाजपा आमदारांनी आंदोलनातून काढता पाय घेतला होता. तरीही कर्मचाऱयांनी आंदोलनातून माघार घेतलेली नाही. राज्य सरकारने कर्मचाऱयांच्या वेतनात वाढ केल्याचेही जाहीर केले. त्यानंतर या कर्मचाऱयांना कामावर हजर होण्यासाठी अल्टीमेटम देण्यात आला होता.
अनेक एसटी कर्मचारी या आंदोलनातून बाहेर पडत कामावर हजर झाले. उर्वरित कर्मचारी अजूनही या बंदमध्ये सहभागी आहेत. या आंदोलनात काहीसी फूट पडली असली तरी केवळ 15 टक्केच कर्मचारी सेवेत रुजू झाले आहेत. एसटी कर्मचारी संपामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी तसेच ग्रामस्थांना एसटी सेवेपासून आजही वंचित राहण्याची वेळ आली आहे. यावर राज्य सरकार एसटीचालकाचा नवा पर्याय काढण्याच्या निर्णयाप्रत आले आहे. राज्य सरकारने नवी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. एसटीतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱयांसह, चालक पुरवठादार संस्थांकडून पुन्हा करार पद्धतीने सेवेत घेण्याची तयारी दाखवण्यात आली आहे. त्यामुळे संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱयांना आता महामंडळ चालवण्याची तयारी राज्य सरकारने सुरु केली आहे.
करार पध्दतीवर मोठय़ा भरतीची शक्यता
महामंडळाने करार पद्धतीच्या भरतीची जाहिरात बुधवारी वृत्तपत्रातून प्रसिद्ध केली आहे. इच्छुक चालकांना 3 दिवसात नजीकच्या आगारात नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर चालक पुरवठादार संस्थांनाही महामंडळाने निमंत्रित केल्याने मोठय़ा प्रमाणात चालक भरती होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.