आज कार्तिकी एकादशी सोहळा- पंढरपुरात भाविकांची तुरळक गर्दी
पंढरपूर / प्रतिनिधी
कोरोनाच्या टाळेबंदीमुळे गेल्या दीड वर्षात राज्यात एकही यात्रा भरली नाही. पंढरपूरच्या सहा यात्रा रद्द झाल्या. त्यामुळे वारकरी भक्तांना विठोबाचे दर्शन घडलेच नाही. यंदा यात्रा होत आहे. परंतु एसटी संपामुळे लाखो वारकरी भक्तांना विठुदर्शनाचा ‘दुरावा’ सहन करावा लागत आहे. त्यामुळे कार्तिकी दशमीदिवशी तुरळक गर्दी पंढरपुरात दिसून आली.
कोरोनामुळे गेल्या दीड वर्षात पंढरपुरात फ्ढारसा हरिनामाचा गजर झालाच नाही. अशात कोरोना लसीकरण वेगात झाल्याने कार्तिकी यात्रा भरली. पण, एसटी संपामुळे मोठय़ा प्रमाणावर वारकरी भक्तांना दर्शनासाठी येता आले नाही. त्यामुळे दीड वर्षांपासून विठ्ठल दर्शनापासूनचा दुरावा काहीअंशी कायम राहिला. सद्यस्थितीत खासगी वाहने आणि रेल्वेतून भाविक पंढरपुरात दाखल होत आहेत. एसटी कर्मचाऱयांचा संप सुरू असल्यामुळे मोठय़ा प्रमाणावर भाविकांना पंढरपुरात येता आले नाही. त्यामुळे सोमवारच्या एकादशीच्या सोहळ्यासाठी देखील खासगी वाहनातून येणाऱया भाविकांची संख्या अधिक असू शकते.
वास्तवात पंढरपुरात केवळ हजारोंच्या गर्दीने भाविक दिसतात. मात्र निश्चित अशी भाविकांची संख्या सांगता येत नाही. 65 एकर परिसरात अवघ्या 100 दिंडय़ा आल्या आहेत. तर विठोबा दर्शनाची रांग केवळ विप्रदत्त मंदिराच्या पुढेपर्यंत आहे. त्यामुळे साहजिकच विठोबाचे दर्शन अवघ्या एक तासात होत आहे. यंदाच्या कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यास तीन लाख भाविक येतील, असा अंदाज प्रशासनाचा होता. मात्र एकादशीच्या पूर्वसंध्येला तीन लाखांच्या निम्मेही भाविक आले का नाही? याबाबत शंका आहे.
आज एकादशी सोहळा
सोमवारी एकादशीचा सोहळा होईल. यासाठी पहाटे अडीच वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार हे विठोबाची सपत्नीक शासकीय महापूजा करतील. यावेळी मानाचा वारकरीही उपस्थित राहील. यानंतर एकादशीच्या मुख्य सोहळ्यास सुरूवात होईल. साधारणपणे दुपारी 12 वाजता परंपरेप्रमाणे रथोत्सव देखील निघेल. गेल्या दीड वर्षात प्रतीकात्मक रथोत्सव निघाला होता. यंदा मात्र रथोत्सव पूर्णपणे परंपरेप्रमाणे निघेल.
TAR