प्रतिनिधी /बेळगाव
एसपीएम रोड येथील रेणुका हॉटेलशेजारील भंगीबोळात स्वच्छतागृह ठेवण्यात आले आहे. याची स्वच्छता व्यवस्थित केली जात नसल्याने कचरा टाकला जात असून घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. याची स्वच्छता करावी, अन्यथा नवीन स्वच्छतागृह बसवून नागरिकांसाठी सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
येथील स्वच्छतेबाबत महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे तक्रार केली असता याची दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभागाकडे येत असल्याचे सांगून जबाबदारी झटकण्यात येत आहे. सध्या विविध आजारांचा सामना नागरिकांना करावा लागत असताना मनपाने स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले आहे. स्वच्छ अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येतात. पण येथील स्वच्छतेकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. तर रस्त्याशेजारी किंवा खुल्या जागेत कचरा टाकणाऱयांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे सांगण्यात येते. पण प्रत्यक्षात ही कारवाई केली जात नसल्याने दंडाच्या कारवाईची घोषणा हवेत विरली आहे. डेंग्यू, मलेरिया अशा विविध आजारांचा फैलाव झपाटय़ाने होत असताना मनपाने जबाबदारी झटकली आहे. त्यामुळे या स्वच्छतागृहाचे नूतनीकरण करण्यात यावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.