वृत्तसंस्था / नवी दिल्ली
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी इंडियन बँक्स असोसिएशनच्या (आयबीए) 74 व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीला रविवारी संबोधित केले आहे. देशाची अर्थव्यवस्था एका नव्या दिशेकडे वाटचाल करत आहे, तसेच उद्योगक्षेत्र नव्या गोष्टी आत्मसात करत असल्याने अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत. यातून भारताला केवळ अधिक संख्येत नव्हे तर मोठय़ा बँकांची गरज असल्याची बाब समोर आल्याचे अर्थमंत्र्यांनी नमूद केले आहे.
भारताला स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) सारख्या 4 किंवा 5 आणखीन बँकांची गरज आहे. अर्थव्यवस्था आणि उद्योगक्षेत्रात अलिकडेच घडून आलेल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर नव्या गरजा निर्माण झाल्या असून त्यांची पूर्तता करण्यासाठी आम्हाला बँकिंगचा विस्तार करण्याची गरज आहे. बँकांच्या ताळेबंदात आता अधिकच सुधारणा झाली आहे. अशा स्थितीत ते बाजारातून निधीची उचल करू शकतात आणि यामुळे सरकारवरील बँकांच्या पुनर्भांडवलीकरणाचा भार कमी होणार आहे. निर्यातीचे 400 अब्ज डॉलर्सचे लक्ष्य गाठण्यासाठी बँकांना प्रत्येक उद्योगक्षेत्राचे स्वरुप आणि गरज समजून घ्यावी लागणार आहे. आगामी नॅशनल असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेडला (एनएआरसीएल) अमेरिकेप्रमाणे बॅड बँक म्हटले जाऊ नये असे उद्गार अर्थमंत्र्यांनी आयबीएच्या बैठकीला संबोधित करताना काढले आहेत.
छोटय़ा स्तरावरील मॉडेल
अनेक जिल्हय़ांमध्ये आर्थिक घडामोडींची पातळी अत्यंत अधिक आहे, पण तेथील बँकिंग सुविधेची उपस्थिती खूपच कमी आहे. अशा ठिकाणी बँकिंग सुविधा वाढविण्याचा प्रयत्न केला जावा. गल्ल्यांमध्ये लघुस्तरीय मॉडेलद्वारे बँकिंग सुविधेचे अस्तित्व कुठे आवश्यक आहे हे निश्चित करण्याचा पर्याय बँकांकडे असल्याचे अर्थमंत्री म्हणाल्या.
बँकिंगमध्ये आमुलाग्र बदल
कोरोना महामारीनंतरची स्थिती पाहिल्यास भारताची बँकिंग क्षेत्राची कामगिरी अत्यंत चांगली राहिल्याचे दिसून येते. भारतीय बँकिंग क्षेत्रात डिजिटलायझेशन यशस्वीपणे अंमलात आणले आहे. महामारीच्या काळात अनेक देशांमधील बँका स्वतःच्या ग्राहकांपर्यंत पोहोचू शकत नव्हत्या. तर भारतीय बँकांच्या डिजिटलायझेशनमुळे डीबीटी आणि डिजिटल यंत्रणेद्वारे छोटय़ा, मध्यम आणि मोठय़ा खातेधारकाला निधी हस्तांतरण करण्यास मदत मिळाल्याचे अर्थमंत्र्यांनी म्हटले आहे.
दिवंगत बँक कर्मचाऱयांचे स्मरण
अर्थमंत्र्यांनी स्वतःच्या संबोधनाच्या प्रारंभी कोरोनामुळे जीव गमावणाऱया बँक कर्मचाऱयांना श्रद्धांजली वाहिली आहे. कोरोना संकटकाळात बँकांच्या विलीनीकरणाचे काम पूर्ण करणे बँकर्ससाठी मोठे आव्हान राहिले. महामारीच्या काळात बँका देशाच्या दुर्गम भागात लोकांना मदत पोहोचविण्याच्या मोहिमेत असताना हे काम झाले आहे. विलीनीकरणामुळे ग्राहकांना कुठल्याही प्रकारची असुविधा झालेली नाही, बँक कर्मचाऱयांनी यासाठी दिलेले योगदान कौतुकास्पद असल्याचे अर्थमंत्री म्हणाल्या.