वार्ताहर/ होंडा
एसीजीएल कंपनीची होंडा व भुईपाल येथील आस्थापने अचानक बंद करण्यात आली असून 1 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबरपर्यंत कामकाज बंद राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. कंपनी व्यवस्थापनाच्या या मनमानी कारभरामुळे कामगार हैराण झाले असून या संदर्भात चर्चा करण्यासाठी भुईपाल येथे काल दि. 1 रोजी कामगारांची बैठक झाली. यावेळी कंपनीच्या व्यवस्थापनाचा निषेध करण्यात आला. कामगारांच्या सतावणुकीचा प्रकार खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
या प्रकरणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सत्तरीचे पालकमंत्री विश्वजित राणे, कामगार आयुक्त यांनी त्वरित लक्ष घालून कामगारांवर होणारा अन्याय दूर करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. कोविड 19 चा सर्वत्र फैलाव झालेला असूनही कंपनीच्या ऑर्डरवर काही परिणाम झालेला नाही. कोरोनाचा फैलाव असूनही कामगार काम करीत आहेत. कंपनीला मोठय़ा प्रमाणात लाभ झाल्याचे कामगार प्रतिनिधींनी सांगितले आहे. केवळ कामगारांची सतावणूक करण्याचा विडा कंपनी व्यवस्थापनाने उचलल्याचा आरोप होत आहे.
या संदर्भात कामगार युनियनने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची भेट घेतली असून त्यांनी या प्रकरणात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आहे. कामगार मंत्री जेनिफर मोंसेरात यांनाही निवेदन देण्यात आले आहे. आपल्याला न्याय मिळेल या आशेवर कामगार आहेत. दरम्यान, कामगार आयुक्तांनी युनियनच्या नेत्यांना सोमवारी, मंगळवारी बैठकीसाठी उपस्थित राहावे असे कळविले आहे.
संबंधितांनी त्वरित लक्ष घालून कामगारांना न्याय न दिल्यास पुढील कार्यवाही करण्यासाठी कामगार सज्ज असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी बाबलो सांवत होते. कालिदास नाईक यांनी सूत्रसंचालन केले तर प्रशांत खानोलकर यांनी आभार मानले.