कामगारांच्या मागण्या मान्य करण्याचे विविध नेत्यांचे आवाहन ; अन्यथा जनता रस्त्यावर उतरणार : आज सांखळी शहरात मोर्चाचे आयोजन
प्रतिनिधी /वाळपई
भुईपाल सत्तरी येथील एसीजीएल कंपनीच्या विरोधात कामगारांच्या संपाचा आजचा तिसरा दिवस होता. मात्र कंपनीच्या व्यवस्थापनाने कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे बुधवारी कामगारांनी वाळपई शहरात मोर्चा काढून जनतेचे लक्ष वेधले. यावेळी अनेक राजकीय, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी या संपात सहभागी होऊन आपला पाठिंबा व्यक्त केला.
आता शेळ मेळावली आयआयटी विरोधी आंदोलना प्रमाणे सत्तरीतील जनतेने एसीजीएल कामगारांमागे खंबीरपणे उभे राहून त्यांचे हात बळकट करण्याचे आवाहन वाळपई येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत करण्यात आले. दरम्यान, आज गुरुवारी कामगार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे लक्ष वेधण्यासाठी सांखळी शहरात भव्य मोर्चा काढून जनतेचे लक्ष वेधणार आहेत.
भुईपाल एसीजीएल कंपनीच्या कामगार बांधवांच्या मागण्या प्रलंबित आहेत. त्या सोडविण्याच्या दृष्टिकोनातून कंपनीचे व्यवस्थापन अपेक्षित सहकार्य करीत नाहीत. याविरोधात संतप्त बनलेल्या एसीजीएल कामगार संघटनेने 18 ऑक्टोबरपासून संप सुरू आहे. आज संपाच्या तिसरा दिवशी कामगारांनी वाळपई शहरातून भव्य मोर्चा काढला. नुहा पेट्रोल पंप परिसरातून ठाणे मार्गावरून मोर्चा थेट कदंबा बस स्थानकावरून पुन्हा वाळपई शहरात आणला. यानंतर मोर्चाचे रुपांतर सभेत झाले पालिकेच्या व्यासपीठावर सभा घेण्यात आली. यावेळी विविध वक्त्यांनी आपल्या भाषणातून कामगारांना जाहीर पाठिंबा व्यक्त केला. सर्वप्रथम रेव्होल्युशनरी गोवन्स संघटनेचे अध्यक्ष मनोज परब यांनी स्थानिकांना डावलून परप्रांतीयांना प्रकल्पामध्ये कॉन्ट्रक्ट पद्धतीने काम देऊन कामगार बांधवावर अन्याय केला जात असल्याचा आरोप केला.
तृणमूल काँग्रेस पक्षाचे दशरथ मांदेकर यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत, स्थानिक आमदार विश्वजित राणे व प्रतापसिंह राणे यांच्यावर निष्क्रियतेचा आरोप केला. कामगारांच्यामागे जनतेने खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहत सामाजिक कार्यकर्ते विश्वेश परब यांनी केले.
सामाजिक कार्यकर्ते ऍड. शिवाजी देसाई यांनी ज्या कामगारांनी प्रमाणिकपणे काम करून या कंपनीच्या उन्नतीसाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या मागण्या पूर्ण करणे ही व्यवस्थापनाची नैतिक जबाबदारी असल्याचे स्पष्ट केले. भाजपचे कार्यकर्ते वासुदेव परब यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या कामगार बांधवांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली.
समाज कार्यकर्ते नंदकुमार कोपर्डेकर, रोशन देसाई, ऍड. भिकाजी गावस यांनी यांनी पाठिंबा दर्शविला. उद्योजक सुरेश देसाई यांनी कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याबद्दल व्यवस्थापनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. गोविंद कोरगावकर, विजय गावकर, तुकाराम गावस, सुभाष परब, प्रशांत खानोलकर, देमू गावकर यांनीही यावेळी विचार मांडले.
सत्तरी तालुक्मयातील सुमारे 70 टक्के कामगार कंपनीत काम करीत आहेत. त्यांना आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरावे लागले, याबाबत मात्र नागरिकांतून नाराजी व्याक्त केली जात आहे.
मुख्यमंत्र्याचे लक्ष वेधण्यासाठी सांखळीत मोर्चा
मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मोठय़ा प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान, आज गुरुवारी सकाळी साखळी शहरात कामगार काढण्यात येणाऱया मोर्चा काढून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे लक्ष वेधण्यात येणार आहेत. विविध राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते सहभागी होणार असून सांखळी परिसरातील नागरिकांनी या कामगार बांधवांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन कामगार संघटनेने केले आहे.