ऑनलाईन टीम / मुंबई
राज्यभर एस टी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन सुरू आहे. गेल्या दोन महिन्यांपासून एस टी सर्व कर्मचारी ठिय्या आंदोलन करत आहेत. एस टी महामंडळाचे शासनात विलीनकरण करण्यात यावे. यासह इतर मागण्यांसाठी एस टी कर्मचाऱ्यांच्याकडून सुरु आहे. या संपावर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुढाकार घेतला आहे. सोमवारी शरद पवार आणि राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांची २२ कर्मचारी संघटनांच्या कृती समितीसोबत सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडली. यावेळी अनिल परब यांनी आतापर्यंत कारवाई न झालेले कर्मचारी कामावर परतले तर त्यांच्यावर कारवाई होणार नाही अशी प्रतिक्रिया बैठकीनंतर दिली आहे.
शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली एसटी कर्मचाऱ्याच्या कृती समितीसोबत आज चर्चा करण्यात आली आहे. कृती समितीने पूर्वी दिलेल्या मागण्या मान्य झाल्या होत्या. मागण्या मान्य झाल्यानंतरही विलनीकरणाच्या मुद्द्यावरुन हा संप सुरु आहे. विलनीकरणा संदर्भात तयार करण्यात आलेली समिती १२ आठवड्यात आपला अहवाल सादर करणार आहे. या अहवालाचे पालन कर्मचारी आणि राज्य शासनावर बंधन असणार आहे.
कर्मचाऱ्यांना मूळ वेतनात पगारवाढ देण्यात आली आहे. पगारवाढीमध्ये काही तफावत झाली आहे. त्याबाबत कृती समितीसोबत चर्चा करण्यात आली आहे. कृती समितीने सातव्या वेतन आयोगाप्रमाणे पगारवाढ देण्यात यावी अशी मागणी करुन आकडेवारी दिली आहे. या आकडेवारीचा अभ्यास करुन निर्णय एसटी सुरु झाल्यानंतर देण्यात येईल,” असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले.