ग्राहकांची गैरसोय, कुलर, एसी नाही, रक्तदाबाच्या रुग्णांमध्ये मोठी समस्या
प्रतिनिधी / पणजी
राज्यात सध्या उकाडा प्रचंड वाढला असून पारा 38 डिग्रीपर्यंत जात आहे. दरवर्षी फेब्रुवारी, मार्चमध्ये फॅन, कुलर, वातानुकूलित यंत्रे यांना मोठी मागणी असते, मात्र यंदा लॉकडाऊनमुळे इलेक्ट्रॉनिक्स दुकाने बंद असल्याने लोकांची मोठी अडचण झाली आहे. उकाडा प्रचंड वाढला आहे. तापमान सहन करण्यापलीकडे गेले आहे. अशा स्थितीत रक्तदाब असलेल्यांना मोठा त्रास होत आहे.
राज्यात गेले महिनाभर लॉकडाऊन चालू आहे. 22 मार्चपासून गोव्यात अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व व्यवसाय बंद आहेत. भुसारी दुकाने, मेडिकल शॉप, दूध केंद्रे व अन्य अत्यावश्यक सेवा तेवढय़ाच सुरू आहेत. इलेक्ट्रॉनिक्स दुकाने, हार्डवेअर, हॉटेल व्यवसाय तसेच अन्य दुकानेही बंद असल्याने लोकांची मोठी गैरसोय होत आहे. सध्या राज्यात तापमान प्रचंड वाढले आहे. सकाळी 11 वाजता पार 34 डिग्रीपर्यंत जातो, तर दुपारी 38 डिग्री पर्यंत तपमान जाते. रात्री 8 वाजले तरी तापमान 31 ते 342 डिग्री असते.
उकाडा असह्य होत असल्याने लोक कुलर, वातानुकूलित यंत्रे खरेदी करण्याच्या तयारीत आहे. दरवर्षी फेब्रुवारी ते एप्रिल, मे पर्यंत या गोष्टींना मागणी असते, पण यंदा नेमके या कालावधीतच लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात 3 मे पर्यंत लॉकडाऊन आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स दुकाने बंद आहेत. उकाडा प्रचंड असल्याने फॅन, कुलर, वातानुकूलित यंत्रे या वस्तूही अत्यावश्यक बनल्या आहेत.
वाढत्या तापमानामुळे त्याचा विपरित परिणाम आरोग्यावर होऊ शकतो. राज्यात रक्तदाबाच्या रुग्णांची संख्या मोठी आहे. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने एप्रिल, मे महिन्यातील उकाडा त्रासदायक ठरत आहे. इलेक्ट्रॉनिक्स दुकानात खरेदीसाठी तशी गर्दी होत नाही. एखादा दुसरा ग्राहक एकावेळी असतो. त्यामुळे सरकारने इलेक्ट्रॉनिक्स दुकाने खुली करण्यास मान्यता देण्यास हरकत नाही. वाटल्यास निर्बंध घालावे, पण ही दुकाने खुली करावीत, अशी मागणी होत आहे. लोकांचा आग्रह असल्याने इलेक्ट्रॉनिक्स दुकानदार अर्धे शहर खोलून तात्पुरर्ती ग्राहकांची गरज भागवितात. सरकारने त्यांना मान्यता दिल्यास ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.