नऊ दिवसांपासून पुरवठा बंद : नागरिकांतून संताप
प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील पाणीटंचाई समस्येचे निवारण तातडीने करण्याची सूचना एलऍण्डटी कंपनीला करण्यात आली आहे. पण अद्यापही पाणी समस्येचे निवारण झाले नसल्याच्या तक्रारी येत आहेत. वडगाव परिसरात गेल्या 9 दिवसांपासून पाणीपुरवठा नसल्याने ऐन दसरोत्सवात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.
चोवीसतास पाणीपुरवठा योजनेच्या अंमलबजावणीमुळे शहरवासियांना पाच दिवसाआड नियमित पाणी मिळत नसल्याने पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. सध्या काही भागात दहा दिवस तर काही भागात पंधरा दिवस पाणीपुरवठा करण्यात आला नसल्याने पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. चोवीसतास पाणीपुरवठा योजनेलादेखील याचा फटका बसला असल्याने संपूर्ण शहरात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱया जलवाहिन्यांना सातत्याने गळती लागत असल्याने शहरात नियमित पाणीपुरवठा होत नाही. ऐन सणात पाण्याची समस्या निर्माण झाल्याने नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. याबाबत आमदार, खासदार आणि पायाभूत सुविधा विभागाच्या अधिकाऱयांनी एलऍण्डटी कंपनीच्या अधिकाऱयांची बैठक आयोजित करून शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्याची सूचना केली होती. तसेच दसरा सणात शहरवासियांना पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये याची खबरदारी घेण्याची सूचना करण्यात आली होती.
काही भागातील पाणीपुरवठा सुरळीत आहे. पण वडगाव परिसरात अद्यापही पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही. वडगाव परिसरात नऊ दिवसांपूर्वी पाणीपुरवठा केला होता. पण त्यानंतर पुरवठा झाला नसल्याने रहिवाशांना पाण्याची समस्या भेडसावत आहे. दसरोत्सव तोंडावर असताना पाणी नसल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. पाणीपुरवठा विभागाकडे तक्रार केली असता दोन दिवसांत पाणीपुरवठा करण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. पण पाणीपुरवठा सुरळीत झाला नसल्याने समस्या निर्माण झाली आहे. वडगाव परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी होत आहे.