कणकवली खरेदी-विक्री संघाने केली ‘कॅश टू कॅरी’नुसार उचल : चेअरमन विठ्ठल देसाई यांची माहिती
वार्ताहर / कणकवली:
लॉकडाऊनमुळे ऐन शेतीच्या हंगामातच शेतीसाठी खत उपलब्ध होत नसल्याने शेतकऱयांमधून नाराजी व्यक्त होत आहे. भात शेतीसाठी आवश्यक असलेल्या युरिया, कृषी उद्योग व सुफलाचा पुरवठा जूनच्या पहिल्या दोन आठवडय़ात होण्याची गरज होती. मात्र, अत्यल्प पुरवठय़ाने शेतकऱयांना खतासाठी वेटिंगवर राहवे लागले आहे. तरीही कणकवली खरेदी-विक्री संघाने ‘कॅश टू कॅरी’ची अंमलबजावणी केल्याने शेतकऱयांना काही प्रमाणात खत पुरवठा करण्यात आला. मात्र, अजून खत उपलब्ध होत नसल्याने शेतकऱयांना येरझाऱया माराव्या लागत आहेत. त्यामुळे याची दखल संबंधितांनी घेण्याची गरज असल्याची मागणी कणकवली खरेदी-विक्री संघाचे चेअरमन विठ्ठल देसाई यांनी दिली.
शेतीचा हंगाम सुरू झाल्यानंतरही खत पुरवठा वेळेत होत नसल्याने तालुक्यातील शेतकऱयांचे प्रचंड हाल झाले आहेत. जिल्हय़ाला युरिया व सुफला खताचा पुरवठा आरसीएफ कंपनीकडून करण्यात येतो. पण यावर्षी कोरोना व लॉकडाऊनमुळे खत पुरवठाच अपुरा झाला.
लॉकडाऊनमुळे कामगार नाहीत!
खत उतरविण्यासाठी रत्नागिरी येथे रॅक आहे. यापूर्वी हा रॅक सिंधुदुर्गात होता. तेव्हा वेळेत खत उपलब्ध होत असे. मात्र, आता रत्नागिरी येथून रॅकवर उतरविलेले खत रस्ता वाहतुकीने जिल्हय़ात आणून पुरवठा केला जातो. पण यावर्षी कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने रत्नागिरी येथे खत भरण्यासाठी कामगार उपलब्ध नाहीत. त्यामुळे या अडचणीत अजून वाढ झाली. ही अडचण असतानाच कणकवली संघामार्फत गोवा येथील जुआरी कंपनीचे युरिया खत मागविण्यात आले. त्या कंपनीने युरियाचा पुरेसा पुरवठा केल्याने काही प्रमाणात तालुक्यातील शेतकऱयांना दिलासा देण्यात यश आल्याचे देसाई यांनी सांगितले.
कृषी उद्योग, सुफलाची मोठी मागणी!
भात शेती व काजू, आंबा बागायतीसाठी कृषी उद्योग, सुफला खताची मोठय़ा प्रमाणात मागणी आहे. मात्र, कृषी उद्योग खत हे कोल्हापूरहून जिल्हय़ाला पुरवठा होते. निसर्ग चक्रीवादळामुळे कृषी उद्योग कंपनीचे कारखान्याचे पत्रे उडून गेल्याने कच्च्या मालाचे नुकसान झाले. त्यामुळे त्या खताचाही आवश्यक तेवढा पुरवठा झालेला नाही. त्यातच जे खत उपलब्ध होते, ते जिल्हय़ात आणायचे झाल्यास लॉकडाऊनमुळे कर्मचारी नाहीत व कोल्हापूरहून जिल्हय़ात आल्यास 14 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी असल्याने तेथील वाहनचालक येथे येण्यास तयार नाहीत.
कुडाळ येथे रॅक सुरू करावा!
जिल्हय़ात अजूनही खताची मोठय़ा प्रमाणात मागणी असताना राज्यस्तरावरील मंत्र्यांच्या दबावामुळे अनेक कारखान्यांतून खत घाटमाथ्यावर वळविले जाते. जिल्हय़ातील शेतकऱयांना वेळेत खत पुरवठा होण्यासाठी खताचा रॅक सिंधुदुर्गात कुडाळ येथे सुरू करण्याची गरज आहे. असे केल्यास जिल्हय़ात सुरळीत खतपुरवठा सुरू होऊन शेतकऱयांची समस्या मार्गी लागू शकते, असे देसाई यांनी सांगितले.