बैल, गायी, म्हशी खरेदी-विक्री व्यवहारात अडचण- बैलजोडीविना शेती करणे अवघड
प्रतिनिधी/ खानापूर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने खानापूर व बिडी येथील जनावरांचा आठवडी बाजार बंद आहे. यामुळे पशुधन खरेदी-विक्री व्यवहार ठप्प असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. अनेक शेतकऱयांना बैलजोडीविना शेती करावी कशी, असा प्रश्न पडला आहे.
सध्या सर्वत्र खरीप पेरणीसाठी मशागत सुरू असून आजही अनेक शेतकरी बैलजोडीचा वापर करतात. सध्या कोरोनामुळे तालुक्यातील खानापूर व बिडी येथे भरणारा जनावरांचा बाजार बंद आहे. त्यामुळे ज्यांना बैलांची खरेदी व विक्री करायची आहेत. त्यांनाही विक्री करणाऱयांपर्यंत पोहोचता येत नाही. मशागतीच्या कामाला वेग आला असला तरी बैलजोडीचा वापर करून शेती कामे करणाऱया शेतकऱयांसमोर समस्या निर्माण झाली आहे.
यंदा शेती मशागत तसेच भात पेरणीसाठी बैलांची वाट न पाहता ट्रक्टरने कामे करून घेण्यास शेतकऱयांनी सुरुवात केली आहे. पण, गेल्या काही दिवसांत पडलेल्या पावसामुळे शेतीत पाणी साचल्याने काही ठिकाणी पेरणीच्या कामांना ब्रेक लागला आहे. एका बाजूला बैलजोडय़ांची कमतरता तर दुसऱया बाजूला लॉकडाऊन व वळीव पावसामुळे पेरणीपूर्व शेतीची कामे करण्याची शेतकऱयांना चिंता वाटत आहे. तसेच काही दिवसांवर खरीप हंगाम आल्याने खरीप पूर्व मशागतीची कामे बैलाअभावी ट्रक्टरद्वारे उरकून घ्यावी लागत आहेत. त्यामुळे यंदा मशागतीच्या कामांसाठी ट्रक्टरला मागणी वाढली आहे. शेती मशागतीच्या कामासाठी बैलजोडी असणे आवश्यक आहे. परंतु, कोरोनामुळे आठवडी बाजार बंद असल्याने बैलजोडी खरेदी-विक्री व्यवहारही ठप्प झाला आहे.
शेतकऱयांची अडचण
खानापूर तालुक्यात शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुग्धोउत्पादनाकडे शेतकऱयांचा कल वाढला आहे. तालुक्यात गावोगावी दूध सोसायटय़ा स्थापन झाल्याने अनेक शेतकऱयांनी गायी, म्हशी खरेदी करून शेती बरोबरच दूध व्यवसायातही अधिक लक्ष घातले आहे. त्यामध्ये शेतकऱयांना नेहमी नवीन गायी, म्हशी खरेदी करण्याकरिता तसेच काहीवेळा असलेल्या गायी, म्हशी विकण्यासाठी सध्या जनावरांचा बाजारच बंद झाल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे.