कर्मचारी संपावर, पाणीपुरवठा ठप्प, महिला संतप्त
प्रतिनिधी/ बेळगाव
पाणीपुरवठा करणाऱया हंगामी कर्मचाऱयांनी मागील काही दिवसांपासून विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन छेडल्याने शहरासह उपनगरांतील पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. कर्मचाऱयांच्या आंदोलनामुळे पाणीपुरवठय़ावर मोठा परिणाम झाला आहे. काही भागात गेल्या 12 दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प झाल्याने महिलांसमोर अडचणी वाढल्या आहेत.
शहरासह उपनगरांतील आझादनगर, न्यू गांधीनगर, उज्ज्वलनगर, समर्थनगर, गांधीनगर, वडगाव आदी भागातील पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. त्यामुळे रहिवाशांना ऐन हिवाळय़ात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दरम्यान, सार्वजनिक विहिरी व कूपनलिकांची सोय नसल्याने पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. पाणीपुरवठय़ाअभावी रहिवाशांना मिळेल तेथून पाणी घेण्याची वेळ आली आहे. काहींना अशुद्ध पाणी घ्यावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांसह लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाणीपुरवठा होत नसल्याने काहींवर टँकरद्वारे पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे. शहरातील पाणीपुरवठय़ाचे काम एल ऍण्ड टी कंपनीकडे दिल्यापासून सातत्याने पाणीपुरवठय़ावर परिणाम होताना दिसत आहे.
आझादनगर येथील रहिवाशांनी केले आंदोलन
मागील काही दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प झाल्याने आझादनगर येथील रहिवाशांनी किल्ला तलावाजवळील अशोक सर्कल येथे शुक्रवारी आंदोलन छेडले होते. दरम्यान, मनपाच्या वरि÷ अधिकाऱयांनी शनिवारी सुरळीत पाण्याचा पुरवठा केला जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, शनिवारी दुपारपर्यंत आझादनगर परिसरात पाणीपुरवठा झाला नव्हता. त्यामुळे रहिवासी पुन्हा पाण्यासाठी आक्रमक झाले होते. दरम्यान, रविवारपर्यंत पाणी न आल्यास पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा आझादनगर परिसरातील रहिवाशांनी दिला आहे.
पाणीपुरवठा सुरळीत सुरू न झाल्यास पुन्हा आंदोलन
-शकीला मुल्ला (नगरसेविका-आझादनगर)
पंधरा दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. त्यामुळे रहिवाशांचे हाल होत आहेत. याबाबत महानगरपालिकेकडे तक्रार केली आहे. मात्र, दुर्लक्ष झाल्याने शनिवारपर्यंत पाणीपुरवठा झाला नाही. पाणीपुरवठा सुरळीत सुरू न झाल्यास पुन्हा रस्त्यावर उतरणार आहोत.
पाण्याविना नागरिकांबरोबर बालकांचेही हाल
-यास्मीन गच्छेवाले (आझादनगर रहिवासी)
पाणीपुरवठा बंद झाल्याने सार्वजनिक नळावर गर्दी होत आहे. मात्र, या ठिकाणीदेखील मुबलक पाणी मिळत नसल्याने पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. हिवाळय़ात अशी परिस्थिती ओढवल्याने उन्हाळय़ात पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची चिन्हे आहेत. पाण्याविना नागरिकांबरोबर बालकांचेही हाल होत आहेत. कर्मचाऱयांनी संप मागे घेऊन पाणीपुरवठा सुरळीत करावा.
अखेर शनिवारी मजगावात पाणीपुरवठा
पाणीपुरवठा करणाऱया हंगामी कर्मचाऱयांनी आपल्या मागण्यांसाठी कामबंद संप पुकारल्याने तब्बल दहा दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प झालेल्या मजगावात शनिवारी सायंकाळी पाणीपुरवठा करण्यात आला. पाणीपुरवठा बंद झाल्याने नागरिकांसमोर पाणी समस्या गंभीर बनली होती. दरम्यान, नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली होती. अखेर शनिवारी मजगाव परिसरात पाण्याचा पुरवठा करण्यात आला.
पाणीपुरवठा ठप्प झाल्याने सार्वजनिक विहिरी व कूपनलिकांवर नागरिकांना विसंबून राहावे लागले होते. दरम्यान, अनेकांना दूषित पाण्याचा वापर करावा लागला होता. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. ऐन हिवाळय़ात पाणीपुरवठा बंद झाल्याने प्रशासनाच्या दुर्लक्षाबाबत नाराजी व्यक्त झाली होती. तब्बल दहा दिवसांनंतर मजगावात पाण्याचा पुरवठा करण्यात आला. पाणीपुरवठा करणाऱया कंपनीने पाण्याचा सुरळीत आणि नियमित पुरवठा करावा, अशी मागणीही नागरिकांतून होत आहे.