रशियन ‘स्पुतनिक-व्ही’ला लवकरच आपत्कालीन वापरासाठी मंजुरी शक्य- लसींची उपलब्धता वाढवण्यावर भर
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशामध्ये कोरोनाच्या दुसऱया लाटेने अक्षरशः थैमान घातल्यानंतर आता लसींची संख्या आणि लसीकरण वाढवण्याकडे पुन्हा एकदा सरकारचा कल दिसून येत आहे. येत्या दहा दिवसांत केंद्र सरकार रशियाच्या ‘स्पुतनिक-व्ही’ या लसीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देऊ शकते. त्यानंतर देशाला कोव्हॅक्सिन, कोव्हिशिल्डनंतर तिसरी लस उपलब्ध होईल. तसेच येत्या ऑक्टोबरपर्यंत देशात पाच कंपन्यांच्या लसी उपलब्ध होऊ शकतील, अशी शक्मयता आहे.
विविध वैद्यकीय कंपन्या लस तयार करत असून सध्या या लसी चाचणीच्या विविध टप्प्यांमध्ये आहेत. नव्या लसी उपलब्ध झाल्यास राज्यांमध्ये सुरू असलेल्या कोरोना लसीच्या तुटवडय़ाची टंचाईसुद्धा कमी होणार आहे. देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत सुरू असलेली वाढ पाहता एक दिलासादायक बाब उघडकीस आली आहे. स्वदेशी लसींच्या निर्मितीबरोबरच विदेशी लसीही देशात आयात करण्याच्यादृष्टीने विविध देश आणि कंपन्यांशी बोलणी सुरू आहेत. त्यानुसार रशियन बनावटीची ‘स्पुतनिक-व्ही’ ही लस भारतात सर्वप्रथम दाखल होण्याची चिन्हे आहेत. तसेच ‘जॉन्सन ऍण्ड जॉन्सन’ निर्मित ‘जेनसेन’ आणि ‘जाइडस कैडिला’ निर्मित ‘झायकोव्ह-डी’ या दोन लसी ऑगस्टपर्यंत देशात उपलब्ध होण्याची चिन्हे आहेत. तसेच ‘सीरम इंडिया’ची ‘नोवावॅक्स’ आणि ‘भारत बायोटेक’ची नेजल लस अनुक्रमे सप्टेंबर आणि ऑक्टोबरपर्यंत सर्वसामान्यांसाठी खुली केली जाऊ शकते, असा अंदाज सध्या व्यक्त केला जात आहे. या सर्व लसी उपलब्ध झाल्यास लसींची संख्या वाढून मोहिमेला गती येईल आणि कोरोना संसर्ग रोखण्यात यश येईल, असा दावा केला जात आहे.
लसीकरणात भारत अव्वल
देशाने कोरोना लसीकरणाच्या बाबतीत शनिवारी मोठी मजल मारली आहे. देशात कोरोनाच्या एकूण 10 कोटी लसी दिल्या गेल्या आहेत. दुसऱया देशांच्या तुलनेत भारताने केवळ 85 दिवसांत हा टप्पा पूर्ण केला. अमेरिकेत 9.2 कोटी, चीनमध्ये 6.14 कोटी लसीकरण पूर्ण झाले आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, इतर देशांच्या तुलनेत भारताने हा मोठा पल्ला गाठला आहे. देशात सुरू असलेल्या लसीकरणाच्या तुटवडय़ामुळे हा वेग काहीसा मंदावला असला तरीही, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेला ‘लस उत्सव’ लक्षात घेता भारत स्वतःचाच विक्रम लवकरच नव्या उंचीवर नेईल, अशी अपेक्षा आहे.
महाराष्ट्रात आव्हानात्मक स्थिती
देशात 16 जानेवारीपासूनच कोरोना लसीकरण मोहीम सुरू झाली होती. आतापर्यंत देशात एकूण 10 कोटी 12 लाख लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या एका आकडेवारीनुसार, केंद्र व राज्यांच्या तुलनेत सरकारतर्फे केलेल्या या उपक्रमामुळे जगात सर्वात कमी मृत्यूदर हा भारतात (1.28 टक्के) आहे. महाराष्ट्र लसीकरणाच्या बाबतीतील देशातील पहिले राज्य बनले आहे. एकटय़ा महाराष्ट्राने एक कोटी लसीकरण पूर्ण केले आहे. तरीही राज्यात संसर्गबाधितांची संख्या वाढत असल्याने आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झालेली दिसत आहे.