भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची भूमिका, स्पर्धा लांबणीवर टाकण्याच्या चर्चेला ठळकपणे प्रारंभ
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोव्हिड-19 चा जागतिक स्तरावरील उद्रेक आणि त्याचे उमटत चाललेले गंभीर पडसाद पाहता यंदा ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियात आयोजित टी-20 विश्वचषक स्पर्धा भरवणे पूर्णपणे अव्यवहार्य ठरेल, अशी भूमिका भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मांडली. मागील गुरुवारी आयसीसीने व्यवस्थापकीय कार्यकारिणी बैठक बोलावली. मात्र, त्यात स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काहीही ठोस दिशानिर्देश दिले नाहीत. त्या पार्श्वभूमीवर बीसीसीआय पदाधिकाऱयाने सदर मत व्यक्त केले.
‘ऑस्ट्रेलियातील ती स्पर्धा कोणत्याही परिस्थितीत भरवायचीच ठरवली तरी अनेक मुद्दे त्यापूर्वी विचारात घ्यावे लागतील. सर्वप्रथम प्रवासावरील निर्बंधापासून सुरुवात करावी लागेल. परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर देखील भारतापासून सर्व देशात नवी मार्गदर्शक सूचनावली जारी होईल आणि त्याचे पालन सर्वांना करावे लागेल. सध्याची स्थिती पाहता, आंतरराष्ट्रीय प्रवास करणे केव्हा सुरक्षित होईल, हे देखील सांगता येणार नाही. काही जण कोव्हिड-19 चे संकट जूनपर्यंत मिटेल, असे म्हणतात. काहींना त्यापेक्षा अधिक कालावधी लागेल, असे वाटते. अर्थात, आंतरराष्ट्रीय प्रवास सुरु झाल्यानंतर देखील कोरोनावर आपले पूर्ण नियंत्रण राहणार का, हे सर्वात आधी अभ्यासावे लागेल’, असे या बीसीसीआय पदाधिकाऱयाने पुढे नमूद केले.
‘प्रामाणिकपणे सांगायचे तर ऑक्टोबरमध्ये टी-20 विश्वचषक स्पर्धा भरवणे पूर्णपणे अव्यवहार्य ठरु शकते. सध्याच्या घडीला लोकांनी एकत्रित येण्याची कल्पना करणे देखील गैर ठरते. त्यामुळे, दुर्दैवाने अशीच गंभीर परिस्थिती यापुढेही कायम राहिली तर क्रिकेट ऑस्ट्रेलिया किंवा आयसीसी स्पर्धा भरवताना कोणत्याही प्रकारची हानी, नुकसान होणार नाही, याची जबाबदारी घेणार का, हा कळीचा प्रश्न असेल. मुळात, ऑस्ट्रेलियन सरकार असा धोका स्वीकारणार का, याचे उत्तर शोधावे लागेल. त्याचप्रमाणे अन्य देशांचे प्रशासन त्यांच्या संघांना प्रवासाची परवानगी देणार का’, असा प्रश्न या पदाधिकाऱयाने व्यक्त केला आणि अंतिमतः सर्वात महत्त्वाचा मुद्दा असलेल्या चाहत्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित केला.
‘चाहते अशा प्रतिकूल स्थितीत स्टेडियमवर येण्यास इच्छुक असणार का आणि ते आले तरी स्टेडियममध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळले जाणार का, हा स्पर्धा आयोजित करण्याच्या प्रक्रियेतील आणखी एक जटिल घटक असेल’, असे तो शेवटी म्हणाला.
प्रेक्षकांविना विश्वचषकाला ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा विरोध
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू ग्लेन मॅक्सवेल व मर्यादित षटकांच्या क्रिकेट संघाचा कर्णधार ऍरॉन फिंच यांनी यापूर्वी प्रेक्षकांविना विश्वचषक स्पर्धा घेण्याच्या संकल्पनेला कडाडून विरोध केला आहे. एकवेळ आयपीएल स्पर्धा प्रेक्षकांविना होऊ शकेल. पण, टी-20 विश्वचषक स्पर्धा रिकाम्या स्टेडियमवर होण्याची कल्पनाही करवत नाही, असे मॅक्सवेल म्हणाला होता. फिंचने देखील त्याला त्यावेळी सहमती दर्शवली होती. ही स्पर्धा कदाचित 1 ते 3 महिन्यांपर्यंत लांबणीवर टाकली जाऊ शकते, असे तो म्हणाला.