राज्य कोरोना तांत्रिक समितीचा अंदाज : कठोर निर्बंध जारी करण्याचा सरकारला सल्ला : सणासुदीच्या काळात नियमांचे पालन करणे आवश्यक
प्रतिनिधी /बेंगळूर
राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत घट होत असून दैनंदिन रुग्णसंख्याही कमी होत आहे. त्यामुळे जनजीवन पूर्वपदावर आले असताना कोरोना तांत्रिक सल्ला समितीने धोक्याचा इशारा दिला आहे. कर्नाटकात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याचे समितीने सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात कडक निर्बंध जारी करण्याचा सल्लाही राज्य सरकारला दिला आहे.
सप्टेंबर महिन्यापासून सण-उत्सवांना सुरुवात होते. या दरम्यान कोरोना नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी झाली नाही तर ऑक्टोबरमध्ये रुग्णसंख्येत मोठी वाढ होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्याचबरोबर राज्यातील जनतेचे कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी वर्षभरात कोरोना प्रतिबंधक लसचा तिसरा डोस देण्याबाबत विचार करण्याची शिफारसही समितीने सरकारकडे केली आहे.
मुलांवर परिणाम होण्याची शक्यता
कोरोनाच्या तिसऱया लाटेचा मुलांवर परिणाम होण्याची शक्यता तज्ञांनी वर्तविली आहे. त्यानुसार पालक व नागरिकांनीही सणासुदीच्या काळात गर्दी न करता कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. सध्या राज्यात कोरोना नियंत्रणात असल्याचे दिसून येत आहे. मात्र, कोरोनाच्या संभाव्य तिसऱया लाटेपासून संरक्षण होण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध लादणे आवश्यक आहे. यासाठी नागरिकांचेही सहकार्य महत्त्वाचे असून त्यांनीही कोरोना नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. मात्र, शेजारच्या केरळमध्ये कोरोनाने डोके वर काढले आहे. त्यामुळे राज्य सरकारने सीमावर्ती भागातील जिल्हय़ात विकेंड कर्फ्यू व नाईट कर्फ्यू जारी केला होता. परिणामी, राज्यातील रुग्णसंख्या स्थिर राहिल्याने खबरदारी म्हणून विकेंड कर्फ्यू रद्द करून नाईट कर्फ्यू कायम ठेवण्यात आला आहे.
कोरोनाबाधित होऊन कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये सहा महिन्यांपर्यंत रोगप्रतिकारशक्ती शकते. त्यानंतर ती हळूहळू कमी होते. देशातील दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. डेल्टा प्लस व्हेरियंट तिसऱया लाटेला कारण ठरणार असून याचा मुलांना मोठा धोका असल्याचेही तज्ञांनी सांगितले आहे. नोव्हेंबरपर्यंतची परिस्थिती अत्यंत कठीण असून तिसऱया लाटेतील रुग्णसंख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारने राज्यात कठोर नियम हाती घेणे गरजेचे असल्याचे राज्य कोरोना तांत्रिक सल्ला समितीचे अध्यक्ष डॉ. एम. के. सुदर्शन यांनी सांगितले.
खबरदारी घेणे अत्यंत गरजेच
दुसऱया लाटेत ज्यांना संसर्ग झाला होता, त्यांना पुन्हा तिसऱया लाटेत संसर्ग होण्याचा धोका आहे. त्यामुळे आगामी दोन ते तीन महिने अत्यंत महत्त्वाचे आहेत. एप्रिल व मे महिन्यात राज्यातील सुमारे 16 लाख नागरिकांना कोरोनाची बाधा झाली असून यातील 50 टक्के बाधित बेंगळूरमधील आहेत. त्याचबरोबर नोव्हेंबरपर्यंत कोरोनाचे चित्र स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे. सणासुदीच्या काळात कोरोना नियम शिथिल करण्यासाठी सरकारवर दबाव आणण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर समितीने हा इशारा दिला आहे.
सप्टेंबरपर्यंत नाईट कर्फ्यू कायम ठेवण्याचा आदेश मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी दिला आहे. कोरोनाची तिसरी लाट दुसऱया लाटेइतकी गंभीर असणार नाही. राज्यातील साडेतीन कोटी नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यानुसार तिसऱया लाटेचा गंभीर परिणाम नागरिकांवर होणार नसल्याचा आशावादही समितीने व्यक्त केला आहे.