ऑनलाईन/प्रतिनिधी
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी करोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान निर्माण झालेल्या ऑक्सिजन तुटवड्याविषयीचा अनुभव सांगितला आहे. देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना रुग्णांवर उपचार करण्यासाठी ऑक्सिजनची कमतरता भासत होती. देशात ऑक्सिजनच्या अभावामुळे अनेक रुग्णांचे प्राण गेल्याच्या दुर्दैवी घटना घडल्या आहेत. देशात ऑक्सिजनच्या कमतरतेचे प्रकरण थेट दिल्ली उच्च न्यायालय आणि देशाच्या सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचलं होतं. दरम्यान ऑक्सिजनच्या या सर्व प्रकाराविषयी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आपला अनुभव सांगितला आहे.
दरम्यान करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये निर्माण झालेल्या ऑक्सिजन तुटवड्यासंदर्भातला एक अनुभव मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शनिवारी रात्री सांगितला. त्यांनी “मला हे सांगायला आता काहीही वाटत नाही की राज्यात जेव्हा ऑक्सिजनचा तुटवडा होता, तेव्हा मी ७ दिवस क्षणभर झोपू शकलो नाही. माझ्याकडे माहिती यायची की अमुक एका हॉस्पिटलमध्ये पुढच्या ३० मिनिटांमध्ये ऑक्सिजन संपणार आहे. मग आम्ही त्या हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करायचो. ऑक्सिजनच्या कमतरतेअभावी सर्वांना ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यासाठी कसरत करावी लागायची. मी स्वत: ऑक्सिजन टँकरच्या चालकांशी फोनवर बोलायचो. ते नेमके कुठपर्यंत पोहोचलेत, किती वेळ लागेल वगैरे माहिती घ्यायचो”, असं चौहान म्हणाले आहेत.