शिवसेना राज्यप्रमुख जितेश कामत यांचे पंतप्रधानांना पत्र
प्रतिनिधी / पणजी
’न खाऊंगा न खाने दुंगा’ असे वारंवार सांगणाऱया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यमान कोरोनाच्या अभूतपूर्व संकटातही भ्रष्टाचार करणाऱया व माणसांच्या मृत्यूतही व्यवहार पाहणाऱया गोव्यातील राजकारण्यांवर आता खऱया अर्थाने कारवाई करण्याची वेळ आली आहे, अशी मागणी शिवसेनेचे गोवा राज्यप्रमुख जितेश कामत यांनी केली आहे. त्याचबरोबर राज्यातील ऑक्सिजन तुटवडा आणि एकुणच आरोग्य खात्यातील भ्रष्टाचाराची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आपल्या या मागणीचे पत्र त्यांनी पंतप्रधानांसह, केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन, केंद्रीय मंत्रीमंडळ सचिव, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, जागतिक आरोग्य संघटना यांनाही पाठविले आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील गोवा सरकार कोरोना स्थिती हाताळण्यात पूर्णतः अपयशी ठरले असून रोज पन्नास-पाऊणशे बळी जात असतानाही लोकांचे जीव वाचविण्यापेक्षा एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याचे खेळ खेळत आहेत, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.
राज्यातील सध्याची कोरोनास्थिती एवढी भयानक अवस्थेत पोहोचलेली असताना स्वतः आरोग्यमंत्रीच पुढील दिवसात रोज 100 ते 200 लोक मरतील अशी बेजबाबदार विधाने करतात. मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांच्यात सध्या कोणताही समन्वय राहिलेला नाही. त्यातून आरोग्य व्यवस्थेची हयगय झालेली आहे. डॉक्टर्स नर्सेस आणि अन्य आरोग्य कर्मचारी अत्यंत चांगले काम करत आहेत, परंतु राजकीय असमन्वयामुळे त्यांच्यावर अनेक बंधने येत आहेत. अशावेळी या प्रकरणाची सीबीआय चौकशी होणेच योग्य आहे, असे कामत यांनी म्हटले आहे.
आरोग्यमंत्रीच स्वतःच्या खात्यातील व्यवहाराची न्यायालयाने चौकशी करण्याची मागणी करतात यावरून त्यांनी खात्यावरील नियंत्रण गमावले आहे हेच स्पष्ट होते. व्हेंटिलेटर खरेदीत कोटय़वधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप एका डॉक्टरनेच केलेला असतानाही आरोग्यमंत्री एकतर तो नाकारत नाहीत आणि पत्रकारांनी त्यासंबंधी विचारल्यास त्या विषयालाच बगल देतात, यावरून ते भ्रष्टाचारात गुंतलेले आहेत, हेही स्पष्ट होते, असे कामत म्हणाले.
सरकारपक्षातीलच एक आमदार असलेल्या बाबूश मोन्सेरात यांनी केलेला आरोपही अत्यंत गंभीर स्वरुपाचा आहे. वाळपईतून आलेल्या एका रुग्णाला खाट मिळवून देण्यासाठी तेथील एका गंभीर रुग्णाला हटवून जमिनीवर झोपविण्यात आले. हे जर खरोखरच घडलेले असेल तर ते अत्यंत अमानवी आहे. त्याचबरोबर जागतिक आरोग्य संघटनेच्या संविधानाच्याही विरोधातील आहे. मानव अधिकारांच्या विरोधातील हा प्रकार आहे, असे कामत यांनी म्हटले आहे.
त्याबरोबर मोन्सेरात यांनी केलेल्या सीबीआय चौकशीच्या मागणीलाही आपण पाठिंबा देतो, असे सांगून या चौकशीसाठी स्वतः बाबूश यांनीही पुढाकार व स्वतःचे अधिकार वापरून चौकशीसाठी सरकारवर दबाव आणावा, तसेच मंत्री विश्वजित राणे यांनीही स्वतःचे अधिकार वापरून चौकशी करून घ्यावी, अशी मागणी कामत यांनी केली आहे.
दरम्यान, पंतप्रधानांना पत्र लिहूनही कारवाई होत नसेल तर आपण न्यायालयात जाणार व कोणत्याही परिस्थितीत हा प्रश्न घसास लावणारच असा निर्धार कामत यांनी बोलून दाखविला. लाखो गोमंतकीयांच्या जीवनमरणाचा हा एक गंभीर विषय आहे. आज घरोघरी कोरोना रुग्ण आहेत. त्यामुळे असे प्रकार आम्ही गांभीर्याने घेतले पाहिजेत. पणजीचे माजी आमदार सिद्धार्थ कुंकळकर म्हापशात जाऊन बाबूश मोन्सेरात यांच्यावर टीका करतात, हे प्रकार योग्य नव्हे. राजकारण करण्यासारखा हा विषय नव्हे याचे भान सर्वांनी ठेवले पाहिजे, असे ते म्हणाले.