: जिल्हाधिकाऱ्यांचे सहकारी, खासगी संस्थांना आदेश
प्रतिनिधी/कोल्हापूर
जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे ऑक्सिजनची गरज ही वाढत चालली आहे. त्यामुळे परराज्यातून ऑक्सिजन आणावा लागत आहे. यामध्ये वेळ आणि श्रम वाया जात आहे. त्यामुळे गंभीर व अतिगंभीर रुग्णांना वेळेत विनाखंड ऑक्सिजन पुरवठÎामध्ये अडचणी निर्माण होत आहेत. त्यासाठी जिह्यातील सर्व सहकारी संस्था, खासगी संस्थांनी ऑक्सिजन प्लॅंट जलदगतीने उभारावेत, असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी रविवारी दिले. याबाबतच्या कार्यवाहीचा अहवाल लवकरात लवकर संबंधित संस्थांचे अध्यक्ष व कार्यकारी संचालकांनी सादर करावा, असेही या आदेशात म्हंटले आहे.
जिल्ह्यातील सर्व सहकारी साखर कारखाने, दुध संघांसह इतर संस्था तसेच खासगी साखर कारखाने, दुध संघांनी त्यांच्यास्तरावर कमीत कमी 50 ते 100 जंबो सिलिंडर दररोज भरता येतील इतक्या क्षमतेचा ऑक्सिजन प्लॅंट रिफिलिंग सुविधेसह स्वखर्चाने उभा करावा. यापेक्षा जास्त क्षमतेचा ऑक्सिजन प्लॅंट उभारण्यास कोणतीही मर्यादा असणार नाही. याची अंमलबजावणी तातडीने करायची आहे. सामाजिक दायित्व म्हणून हे काम करायचे आहे. यासाठी राज्यात आपत्ती अधिनियम 2005 लागू केलेला असल्यामुळे या निर्देशांचे पालन करणे आवश्यक आहे. हे प्लॅंट उभे राहील्यास गरजू रुग्णांना तसेच खासगी व शासकीय कोविड रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा हा आवश्यकतेप्रमाणे शासकिय दराने करता येईल. येणार्या काळात या प्रकल्पामध्ये तयार होणारा ऑक्सिजन हा कोरोनाचा संसर्ग संपल्यानंतर इतर उद्योगांना कायमस्वरुपी पुरविता येणार आहे. ज्या कारखाना किंवा संस्थेचे स्वत:चे रुग्णालय आहे त्यांना यामुळे या प्लॅंटमधून ऑक्सिजनची गरज भागविता येणार आहे.
संस्थास्तरावर तातडीने ऑक्सिजन उत्पादन युनिट, सिलिंडर भरण्याच्या सुविधेसह प्लॅंट उभारणीबाबत नियोजन व कार्यवाही तातडीने करुन त्याबाबतचा अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर करावा, असे जिल्हाधिकार्यांनी आदेशात म्हंटले आहे.