छत्तिसगडच्या आरोग्यमंत्र्यांचा आरोप
रायपूर / वृत्तसंस्था
ऑक्सिजनअभावी देशात एकाही मृत्यूची नोंद झाली नसल्याची माहिती केंद्र सरकारने राज्यसभेत दिल्यानंतर सुरू झालेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी अद्यापही थांबलेल्या नाहीत. याप्रकरणी काँग्रेस-आम आदमी पक्षापाठोपाठ आता छत्तीसगडचे आरोग्यमंत्री टी. एस. सिंह देव यांनी केंद्रावरच उलट आरोप केले आहेत. ऑक्सिजनअभावी झालेल्या मृत्यूंसंदर्भात केंद्र सरकारने दिलेले निवेदन हे संसदेची दिशाभूल करणारे आहे, असे त्यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारने राज्यांकडून अशी कोणतीही माहिती मागवलेली नव्हती असे स्पष्टीकरण देत आमच्याकडून जर काही चूक झाली असेल, तर ती सुधारून त्याबद्दल आमची माफी मागण्याची तयारी आहे, असेही ते पुढे म्हणाले. केंद्राच्या भूमिकेबाबत शंका उपस्थित करतानाच सर्व राज्य सरकारांनी दुसऱया लाटेत ऑक्सिजनअभावी झालेल्या मृत्यूंसंदर्भात ऑडिट करायला हवे, असेही त्यांनी सुचविले आहे.
गेल्या दोन-चार दिवसांपासून देशात ऑक्सिजनअभावी झालेल्या मृतांच्या संदर्भात मोठी चर्चा सुरू असून केंद्र सरकार आणि राज्य सरकारांमध्ये यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी संसदेमध्ये ऑक्सिजनअभावी दुसऱया लाटेमध्ये कोणत्याही कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद नाही अशी माहिती दिल्यानंतर त्यावरून गदारोळ सुरू झाला आहे. केंद्र सरकार स्वतः राज्यांमधून माहिती गोळा करत नसून राज्य सरकारांकडून आलेली माहिती एकत्र करून केंद्र सरकार आकडेवारी सादर करत असते, अशी भूमिका केंद्राकडून मांडली जात आहे. या मुद्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर राजकीय आरोपास्त्र जोरात सुरू आहे.
केंद्र सरकारच्या दाव्यानंतर काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने केंद्र सरकारविरोधात विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव आणण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी सरकारच्या दाव्यावर आक्षेप घेत जोरदार टीका केली. दरम्यान, भाजपकडून संबित पात्रा यांनी विरोधकांना कडक शब्दात फटकारत सरकारने संसदेत मांडलेली आकडेवारी राज्यांनी पुरविलेल्या अहवालानुसार असल्याचे स्पष्टीकरण दिले होते.