केंद्र सरकारचे प्रतिपादन, धोरणासंबंधी ठाम
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात कोरोना लसींच्या उत्पादनाचा वेग वाढविण्यात येत असून ऑगस्ट अखेरीपर्यंत प्रतिदिन 1 कोटी लोकांचे लसीकरण करण्याची क्षमता प्राप्त होईल, असा विश्वास केंद्र सरकारने व्यक्त केला आहे. या वर्षाच्या अखेरीपर्यंत देशात 70 टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे.
लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्यात येत आहेत. राज्यांना आतापर्यंत 4 कोटी लसी विनामूल्य देण्यात आल्या आहेत. ऑगस्ट अखेरीपासून पुढे प्रतिदिन 1 कोटी लोकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. तेवढी क्षमता प्राप्त करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहे. आतापर्यंत जवळ जवळ 22 कोटी लोकांना लसी देण्यात आल्या आहेत. त्यापैकी 3 कोटी लोकांना दोन डोस देण्यात आले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने दिली.
लसींचे मिश्रण नको
दोन लसींचे मिश्रण केले जाऊ नये अशी सूचना केंद्राने दिली आहे. सध्या अशा मिश्रणावर प्रयोग सुरू आहेत. त्यांचे परिणाम समोर येईपर्यंत कोणीही लसींच्या मिश्रणाचा प्रयोग स्वतःहून करू नये. अद्याप असे प्रयोग बाल्यावस्थेत असून त्यांचे नेमके परिणाम शरीरावर काय होतील यासंबंधी माहिती मिळालेली नाही. त्यामुळे असे प्रयोग केले जाऊ नयेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
नव्या रुग्णांच्या संख्येत घट
सोमवार संध्याकाळ ते मंगळवार संध्याकाळ या चोवीस तासांमध्ये नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत आणखी घट झाली असून ती 1 लाख 23 हजार 357 इतकी नोंद करण्यात आली आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या मोठी असल्याने सलग 17 व्या दिवशी उपचाराधीन रुग्णांची संख्या कमी झाली असून आता ती 20 लाखांहून कमी झाली आहे. बाधितांचे प्रमाणही 6.6 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. 30 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांनी रुग्णसंख्येत घट नोंदविली आहे.
धोरण तयार करा
ब्लॅक फंगस या विकारावरील औषधांच्या वितरणासंबंधी धोरण तयार करा, अशी सूचना दिल्ली उच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला करण्यात आली आहे. या औषध वितरणाची प्राथमिकता ठरवा आणि त्याप्रमाणे कृती करा. तरूण आणि ज्यांचा जीव वाचविला जाऊ शकतो, त्यांना प्रथम औषध दिले जावे, अशाही महत्वपूर्ण सूचना दिल्ली उच्च न्यायालयाने केल्या आहेत.
डीआरडीओकडून औषधाचे दिशानिर्देश
कोरोनाचा प्रतिकार करणारे प्रभावी औषध डीआरडीओने तयार असून लवकरच त्याचे मोठय़ा प्रमाणात उत्पादन सुरू केले जाणार आहे. सध्या या औषधाचे मर्यादित डोस उपलब्ध आहेत. त्याच्या उपयोगासंबंधी दिशानिर्देश या संस्थेने प्रसिद्ध केले आहेत. या औषधाचे नाव 2-डीऑक्झी डी-ग्लुकोज (2-डीजी) असे आहे. हे औषध सौम्य ते तीव्र संसर्गाच्या रुग्णांना लवकरात लवकर दिले जावे. संसर्ग झाल्यापासून 10 दिवसांच्या आत औषधाचा उपयोग सर्वात प्रभाली ठरू शकतो. ज्यांना तीव्र मधुमेह (डायबेटिस), श्वसनाचा तीव्र त्रास, तीव्र हृदयविकार, यकृताचा गंभीर विकार किंवा आतडय़ांचे गंभीर विकार असणाऱयांवर या औषधाचा अद्याप प्रयोग करण्यात आलेला नाही, हे स्पष्ट करण्यात आले आहे. डॉक्टर्स, रुग्ण आणि रुग्णालयांनी या औषधाच्या मागणीसाठी हैदराबाद येथील डॉ. रेड्डीज लॅबशी संपर्क करावा असेही आवाहन डीआरडीओने केले आहे.