आयटी, शिक्षण क्षेत्राची आघाडीः 24 टक्के झाली वाढ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अर्थव्यवस्था पुन्हा रूळावर परतली असून देशात नोकरभरतीचे प्रमाण वाढल्याची बाब समोर आली आहे. वर्षाच्या आधारे पाहता भरतीत 89 टक्के वाढ झाली आहे. नोकरी जॉबस्पीक यांच्या सर्वेक्षणात ही बाब स्पष्ट झाली आहे.
ऑगस्ट 2019 च्या कोरोनापूर्व स्थितीची तुलना केल्यास नोकरभरती ऑगस्ट 2021 मध्ये 24 टक्के जास्त राहिली आहे. एकंदर आढावा घेतल्यास आयटी क्षेत्रात 89 टक्के भरतीत वाढ झाली आहे. म्हणजेच अनेकविध आयटी क्षेत्रातील कंपन्यांनी या काळात नव्या उमेदवारांना सामावून घेतले आहे. त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्रात 102 टक्के, रियल इस्टेट 15 टक्के, वैद्यकीय/आरोग्य क्षेत्र 8 टक्के, फार्मा/बायोटेक क्षेत्र 7 टक्के, विमा क्षेत्र 6 टक्के इतकी वाढीव भरती ऑगस्टमध्ये नोंद झाली आहे.
तथापि, ट्रव्हल व हॉस्पिटॅलिटी क्षेत्र मात्र अद्यापही कोरोना निर्बंधामुळे प्रभावित राहिले आहे. देशभरातील त्यांच्या सेवा मोठय़ा प्रमाणात प्रभावीत झाल्या आहेत. याचा परिणाम भरती न होण्यात दिसला. मागच्या महिन्यात या दोन्ही क्षेत्रात 53 टक्के इतकी भरती कमी झाली आहे.
बेंगळूर आघाडीवर
उपलब्ध माहितीनुसार देशातील 6 आघाडीवरच्या मेट्रो शहरात ऑगस्टमध्ये 39 टक्के भरतीचे प्रमाण वाढलेले दिसले. नोकरभरती करण्यात बेंगळूर शहराने बाजी मारली आहे. 2019 च्या तुलनेत बेंगळूरमध्ये भरतीचे प्रमाण 66 टक्के अधिक राहिले आहे.
इतर शहरांची टक्केवारी
हैदराबाद………… 61 टक्के
पुणे………………. 54 टक्के
चेन्नई…………….. 30 टक्के
दिल्ली-एनसीआर. 16 टक्के
मुंबई…………….. 4 टक्के
वर उल्लेखल्याप्रमाणे हैदराबाद व पुणे शहरांची प्रगती उल्लेखनीय आहे. पण मुंबईत भरती फक्त 4 टक्के वाढीव राहिली आहे.