प्रतिनिधी / कोल्हापूर
जिह्यात 20 ते 26 जुलैपर्यंत कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे इतर जिह्यातील शहरी व ग्रामीण भागातून कोल्हापूर जिह्यामध्ये येण्यासाठी देनदिन किंवा इतर स्वरुपातील प्रवासाचे कोणतेही ई परवाने, इतर परवानग्या शनिवारपासून (18 जुलै) पुढील दोन आठवडय़ांच्या कालावधीसाठी देऊ नयेत. केवळ वैद्यकीय तातडीची खात्री झाल्यास व सदर व्यक्ती आपल्या क्षेत्रातील रहिवासी असल्यासच (आधारकार्ड पत्यानुसार) परवानगी द्यावी. यातून मालवाहतूक व अत्यावश्यक सेवा व वैद्यकीय सेवेत असेलेल्या व्यक्तींना व वाहनांना सुट असेल. हे अपवाद वगळता जिह्यात येण्यासाठी व्यक्ती व वाहनांना देण्यात येणारे कोणत्याही प्रकारचे प्रवासी परवाने देऊ नयेत असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले.
‘कोव्हीड 19’ प्रतिबंधात्मक उपाययोजनेतंर्गत राज्यात लॉकडाऊनची अंमलबजावणी केली जात आहे. त्यामुळे विविध भागात लॉकडाऊनमध्ये अडकलेले प्रवासी, विद्यार्थी, कामगार आदींना त्यांच्या मुळ गावी जाण्यासाठी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व पोलीस आयुक्तांकडून ई परवाने दिले जातात. परंतु, सद्यस्थितीत देण्यात येणारे परवाने कोल्हापूर जिह्यात सर्वसाधारण वास्तव्य नसणाऱया व्यक्तींना दिले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱयांनी ऑनलाईन प्रवासी पास दोन आठवडे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.