कर्मचाऱ्यांची उडाली तारांबळ
प्रतिनिधी/कोल्हापूर
गेले दोन दिवस अंबाबाईच्या `व्हीआयपी’ दर्शनावरुन जोरदार चर्चा रंगली असतानाच रविवारी (दि.10) सकाळी 11 च्या सुमारास अचानक जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष राहुल रेखावार यांनी सपत्निक रांगेतून दर्शन घेतले. कोणालाही याची पूर्वसुचना त्यांनी दिली नसल्याने उपस्थित कर्मचाऱ्यांसह पोलिसांची तारांबळ उडाली. रविवारी गर्दी असूनही त्यांनी सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे घेतलेले रांगेतून दर्शन हे चर्चेचा विषय ठरला.
नवरात्रौत्सवात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने करवीर निवासीनी अंबाबाई दर्शनासाठी भाविकांना ई-पासची सुविधा केली आहे. ऑनलाईन बुकींग असणार्या भाविकांनाच दर्शनासाठी मंदीरात प्रवेश दिला जात आहे. छत्रपती शिवाजी चौक येथे मुख्य दर्शनासाठी रांगेचे नियोजन केले आहे. या ठिकाणी थर्मल स्पॅनिंग, ई-पासची बुकींगची शहानिशा करणे, अशा दर्शनासह कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करुन प्रवेश दिला जात आहे. रविवारी सकाळच्या सुमारास अचानक जिल्हाधिकारी रेखावार हे सपत्निक या ठिकाणी आले. काही अंतरावर आपले वाहन लावून सर्वसामान्यांप्रमाणे ते रांगेत उभे राहील्याने कोणाच्याही लक्षात आले नाही. जिल्हाधिकारी व त्यांच्या पत्नी यांनी दर्शनाचे सर्व नियम पाळत रांगेतून दर्शनासाठी मार्गक्रमण केले. रांगेतून काही अंतर चालत गेल्यानंतर ते जिल्हाधिकारी असल्याचे उपस्थित देवस्थानचे कर्मचारी व बंदोबस्तावरील पोलीसांना समजले. कोणतीही पूर्वसुचना न देता जिल्हाधिकारी आल्याने कर्मचारी व पोलीसांची चांगलीच तारांबळ उडाली. जिल्हाधिकारी तथा देवस्थान समितीचे अध्यक्ष असल्याने रेखावार यांना थेट प्रवेश मिळाला असता. परंतु त्यांनी सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे रांगेतून जाऊन दर्शन घेतले.