प्रतिनिधी / पणजी
काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी भाजप तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या गोव्यासाठी झालेल्या ऑन लाईन रॅलीवर केलेली टीका निराधार असून काँग्रेसतर्फे करण्यात आलेले आरोप भाजपने फेटाळून लावले आहेत.
भाजपचे प्रवक्ते सुभाष फळदेसाई आणि अनिल होबळे यांनी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत कॉग्रेसच्या टीकेला उत्तर दिले. भाजपच्या या ऑन लाईन रॅलीला मिळालेला भरघोस प्रतिसाद पाहून काँग्रेस नेते बिथरले आहेत. त्यांनी भाजपवर विनाकारण आग पाखड केली आहे. गोव्यातील सुमारे चार लाख लोकांनी रॅलीत सहभाग घेतला हे काँग्रेसला मानवले नाही म्हणून ते उगाचच विरोध करण्यासाठी कुरापती करत आहेत. रॅलीसाठी रु. 50 लाख खर्च झाले हा जावईशोध काँग्रेसने कला लावला? ते सांगावे अशी मागणी श्री. होबळे व श्री. फळदेसाई यांनी केली आहे.
गोव्यातील अनेक पुल व राष्ट्रीय महामार्गची सुधारणा मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळे झाली. त्यांनी कोटय़ावधीची मदत गोव्याला दिली. केंद्रात-गोव्यात काँग्रेस सरकार होते तेव्हा गोव्यासाठी किती मदत मिळाली? ते काँग्रेस नेत्यांनी सांगावे, असेही भाजपच्या प्रवक्त्यांनी सूचित केले. कोरोनाच्या सावटात भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी लोकांना मदत केली. काँग्रेसचा एक तरी कार्यकर्ता लोकांना मदत करताना दिसला काय? असा प्रश्न भाजप प्रवक्त्यांनी उपस्थित केला. भाजपाने अनेक योजना लागू केल्या. काँग्रेसने व प्रामुख्याने दिगंबर कामत मुख्यमंत्री असताना किती योजना आणल्या? ते सांगावे, अशी मागणी भाजपाने केली आहे.