प्रतिनिधी/ सातारा
शाळा सुरु करण्याबाबत सातत्याने जे वृत्त पालकांना पहायला मिळत आहे. त्यावरुन पालकवर्गात सध्या संभ्रमाचे आणि चिंतेचे वातावरण आहे. कोरोनामुळे मुले न पाठवण्यावर पालकवर्ग ठाम असून ऑनलाईन शाळा सुरु करण्याबाबत सध्या नुसत्याच वावडय़ाच सुरु आहेत. त्याबाबत सातारा जिल्हा परिषदेच्या माध्यमिक आणि प्राथमिक दोन्हीही विभागाकडे राज्य शासनाकडून अधिकृत कसलेही पत्र आले नसल्याची खात्रीशीर माहिती आहे. सोमवारी फक्त शाळेत शिक्षक जावून हजेरी लावतील असे समजते. जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे हे सोमवारी शाळेबाबत स्वतः माहिती घेणार आहेत.
कोरोनामुळे तब्बल तीन महिने शाळांना सुट्टी आहे. दरवर्षी नवीन शैक्षणिक वर्ष जुनमध्ये सुरु होते. मात्र, कोरोनाचा कहर थांबयाचे नाव घेईना, त्यामुळे ऑनलाईन शाळा सोमवारपासून सुरु होणार अशी चर्चा होत असताना, शिक्षण विभागाकडे चौकशी केली असता तसा अधिकृत काहीच आदेश नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे ऑनलाईन शाळा भरवण्याबाबत नुसत्याच वावडय़ा असून सोमवारी फक्त शिक्षकच शाळेत हजेरी लावणार आहेत. काही शाळांनी सोमवारी शाळा सुरु करण्याची तयारीही केली आहे. पालकांनी मात्र आपला विद्यार्थी शाळेत न पाठवण्यावर ठाम राहिले आहेत. त्यामुळे नेमके अजूनही संभ्रम सुरु आहे.
सोशल मीडियावर पालकांचे सवाल..
शाळा सुरू करण्याच्या चर्चेवर एका पालकाने विचारलेले प्रश्न पुढील प्रमाणे कोरोनावर खात्रीशीर औषध सापडले आहे का?, लहान मुलांची रोग प्रतिकार क्षमता कमी नसते का?, प्रत्येक बेंचवर ऐक विद्यार्धी बसवाल. पण सध्या ऐका बेंचवर तीन तीन विद्यार्थी दाटीवाटीने बसविले जातात. त्या पटसंख्येच्या मानाने..जास्त बेंच व खोल्या लागतील…त्या कशा उपलब्ध करणार?, शाळा भरताना व सुटल्यावर होणारी गर्दी कशी टाळणार?, मधल्या सुट्टीत टाँयलेटमध्ये गर्दी होते त्याचे नियोजन काय?, जिथे शहाणे माणसे ऐकत नाहीत. तिथे लहान मुले ऐकतील का ?, मोठय़ा माणसांना त्रास झाला तर नेमके काय होतय सांगता येते…लहान मुले सांगु शकतील का ?, सर्व व्यवस्थित आहे हे दाखविण्यासाठी या साठी शाळा सुरू करायच्या आहेत का ?, या तीन महिन्यात मुले जे नाही ते करत आहेत हे पालकांनी जवळून पाहीलेले आहे. तरी ते शाळेत पाठवतील का?, प्रत्येक मुलाकडे लक्ष देणे शिक्षकांना शक्य आहे का ?, पहिले काही दिवस नियम पाळले जातील पण नंतर दुर्लक्ष होणार नाही का ?, शाळेत संसर्ग झाला तर शालेय संस्था जबाबदारी स्विकारुन पुढील सहकार्य करतील का हात झटकुन जबाबदारी टाळतील. मुलांवर प्रयोग करण्यापेक्षा लोकसभा व विधानसभा चालु करुन कोरोना संसर्ग वाढतो कि नाही हे पाहणे जास्त योग्य वाटत नाही का?, स्कुल बस..रिक्षावाले मुलांची ने-आण करताना नियम पाळतील?, उद्या शाळेत एखाद्या विद्यार्थ्यांला व्हायरसची लागण झाली तर वर्गातील सर्व विद्यार्थी व शिक्षकांना क्वॉरांटाईन करावे लागेल. क्वारांटाईनकरीता आपल्या मुलाला, मुलीला एकटे सोडण्याची कुठल्या पालकांची तयारी होईल. बहुतेक पालकांना अलीकडे एक किंवा 2 अपत्ये आहेत, जर त्यांच्या मुलांना काही बरे वाईट झाले तर ते कोणाच्या आधारे जगणार?, शिक्षण महत्त्वाचे की जीवन? एक वर्ष मुलाने कमी अभ्यास केला किंवा नाही केला तर असे किती नुकसान होणार आहे?, प्रयोग करुन पहायला मुले काय माकडे किंवा उंदीर आहेत का ?… यापैकी कोणाचे उत्तर हो म्हणून आहे.
शासनाचा आदेश येत नाही तोपर्यंत..
जोपर्यंत शासनाचा आदेश येत नाही, तो पर्यंत काहीच करता येत नाही. उद्या फक्त शिक्षक बोलवले आहेत. त्यांना पाठय़पुस्तके किती जमा झालेत, इयत्ता दुसरी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना वाटण्याच्या सुचना दिल्या आहेत. ऑनलाईन बाबत अजूनही क्लिअर काही नाही. त्याला प्रत्येकाकडे टीव्ही पाहिजे, स्मार्ट फोन पाहिजे. वाकेश्वरला आम्ही काय केले, समोरासमोर टीचींग करायचे, त्या विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारयचे आणि उत्तरे विद्यार्थ्यांनी द्यायची.
मानसिंगराव जगदाळे शिक्षण व अर्थ समितीचे सभापती
कोणतेही आदेश नाहीत…
आम्हाला तर अजूनही शासनाकडून काहीच निर्देश नाही. आम्हीही शाळांना ऑनलाईन शाळेबाबत काहीच लेखी कळवलेले नाही. त्यामुळे शाळा आताच सुरु करण्याचा प्रश्न येतच नाही.
प्रभावती कोळेकर प्राथमिक शिक्षणाधिकारी
समक्ष उपस्थितीत शाळा नसणार आहे
उद्या ज्यांना ऑनलाईन शाळा सुरु करायचे आहे ते करु शकतात पण सक्ती नाही. ऑनलाईन दिवसभर घ्यायचे नाही तर तेही तासभर घ्यायचे आहे. त्यातल्या त्यात प्राधान्याने दहावी, बारावी घेतले तर ठिकं.शासनाचा लेखी आदेश आल्याशिवाय कोणतीही कार्यवाही नाही.शाळेत शिक्षकांनी प्रेझेंटी लावायची ती बाकीची तयारी करण्यासाठी.विद्यार्थी घरी राहून स्वयंम अध्ययन करतील.आता मुलांच्या हाती काहीच नाही. काहींच्याकडे मोबाईलपण नाही.समक्ष उपस्थितीत शाळा नसणार आहे.
राजेश क्षीरसागर माध्यमिक शिक्षणाधिकारी