विद्यार्थ्यांच्या डोळय़ांवर ताण पडत असल्याने शिक्षणमंत्र्यांकडून चिंता व्यक्त
प्रतिनिधी / बेंगळूर
शिक्षक आणि विद्यार्थ्यांना कोरोना संसर्गाचा धोका असल्याने सार्वजनिक शिक्षण खात्याने मागील आठवडय़ात ‘विद्यागम’ योजनेला तात्पुरती स्थगिती दिली होती. ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देण्याच्या मुद्दय़ाबाबत अनेकांची भिन्न मते आहेत. तथापि, ऑनलाईन पद्धतीने चालविण्यात येणाऱया वर्गांमुळे विद्यार्थ्यांच्या अधिक डोळय़ांवर ताण पडत आहे. त्यामुळे शिक्षण तज्ञांनी दिलेला अहवाल आणि सल्ल्यांच्या आधारे सरकार मार्गसूची जारी करणार आहे, अशी माहिती प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांनी दिली.
यासंबंधी सुरेशकुमार यांनी शिक्षण खात्याच्या आयुक्तांना पत्र पाठवून राज्यात ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांच्या डोळय़ांवर अधिक ताण पडत असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांवर प्रसिद्ध होत आहे. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणासंबंधी तज्ञांनी दिलेला अहवाल आणि सल्ल्याच्या आधारे मार्गसूची तयार करण्यात आली आहे. या अहवालाच्या आधारे विस्तृत आदेश लवकरच जारी करण्यात येईल, असे सुरेशकुमार यांनी सांगितले आहे. विद्यागम योजनेला स्थगिती मिळाली असली तरी राज्यातील अनेक शाळांनी ऑनलाईनच्या माध्यमातून शिक्षण देणे सुरू ठेवले आहे. मात्र, त्यासाठी कालावधी निश्चित केलेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना तासन्तास मोबाईल, लॅपटॉपसमोर बसावे लागते.