”आमच्या जीवाचं काही बरं वाईट झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी ही भारत सरकारची”
ऑनलाईन टीम / तरुण भारत
विरोधी पक्षांनी आरोप केल्याप्रमाणे युक्रेन – रशिया युद्ध सुरु असताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपच्या प्रचारात व्यस्त होते. तसेच युद्धाच्या भडक्यात भारतीय नागरिक आणि विद्यार्थी जीवन – मरणाच्या सिमेवर पुरते अडकले असताना पंतप्रधान मात्र हिमालयातील शंकर मंदीरात डमरु वाजवत आहेत. असा ही आरोप विरोधी पक्ष करत आहेत. अशा वेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एक व्हिडीओ शेअर करत मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकले आहेत तर अनेक भारतीय विद्यार्थ्यांना आतापर्यंत मायदेशी परत आणण्यात आलंय. याबरोबर अनेक विद्यार्थ्यांना युक्रेनच्या सीमेलगत असणाऱ्या देशांमध्ये नेण्यात आलंय. दरम्यान, युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी राबवली जात असलेल्या मोहिमेवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एक व्हिडीओ शेअर करत टीका केली आहे. या व्हिडीओला “ऑपरेशन गंगा हे निव्वळ मोदी सरकारचे ढोंग आहे, प्रत्यक्षात विदयार्थी स्वतःचा जीव धोक्यात घालून ६०० किलोमीटर चालत सीमेवर जात आहे.” असे कॅप्शन नाना पटोले यांनी देत एक व्हिडीओ शेअर केला आहे.
काय आहे व्हिडीओत ?
या व्हिडीओमध्ये विद्यार्थी आपल्यावर ओढवलेल्या कठिण स्थितीवर भाष्य करत आहेत ते म्हणतात, “आम्ही सुमी स्टेट युनिव्हर्सीटीचे विद्यार्थी आहोत. आज युद्धाचा १० वा दिवस आहे. रशियाने युद्धबंदी करत नागरिकांना युक्रेनमधून बाहेर पडता यावं, यासाठी मानवतावादी मार्ग उघडला आहे. त्यापैकी एक मारियुपोलमध्ये आहे. मारियुपोल सुमीपासून ६०० किलोमीटर दूर आहे. सकाळपासून इथे हल्ले सुरू आहेत. आम्ही सगळे घाबरले आहोत. आम्ही भारतीय दूतावासाकडून मदतीची खूप वाट पाहिली, परंतु आता आम्ही वाट पाहू शकत नाही. आम्ही आमचा जीव धोक्यात घालून युक्रेनच्या सीमेकडे निघालो आहोत.
आमच्या जीवाचं काही बरं वाईट झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी ही भारत सरकार आणि भारतीय दूतावासाची असेल. आम्हाला काही झाल्यास हे ऑपरेशन गंगाचं अपयश असेल. सुमी स्टेट युनिव्हर्सीटीच्या विद्यार्थ्यांचा हा शेवटचा व्हिडीओ आहे, तुम्हाला माहित असावं, की आम्ही सीमेच्या दिशेनं निघालोय, म्हणून हा व्हिडीओ आम्ही शेअर करत आहोत,” असं या विद्यार्थ्यांनी म्हटलंय. हेच निमीत्त साधत काँग्रेस नेते नाना पटोले यांनी मोदी सरकारवर सडकुन टीका केली आहे.