प्रतिनिधी/ रत्नागिरी
गेल्या 4 दिवसांपूर्वीच संपूर्ण कोकणात पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आलेला असताना होणाऱया अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर यंत्रणा सज्ज राहिली आहे. पण गेल्या 2 दिवसांपासून काहीशी विश्रांती घेतलेल्या पावसाने दिलेल्या अंदाजानुसार जिल्हय़ात शुक्रवारी दमदार हजेरी लावली. अगदी सायंकाळपर्यंत रत्नागिरीत दमदार पर्जन्यवृष्टी झाली. त्यामुळे नागरिकानीही सावधानता बाळगली आहे. दरम्यान जिह्यात 14 जूनपर्यंत मुसळधार पावसाच्या शक्यतेने 4 एनडीआरएफची पथके दाखल झाली असून साडेपाच हजार लोकांच्या स्थलांतराची व्यवस्था केली आहे.
गेल्या 4 दिवसांपूर्वी ऐन पावसाच्या प्रारंभात दोन-तीन दिवस कडकडीत उन पडले होते. पण त्यानंतर मृग नक्षत्राच्या पावसाची दमदार एन्ट्री जिल्हय़ात झाली. अशावेळी हवामान विभागाने संपूर्ण कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट जाहीर केला. त्यामुळे होणाऱया अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनस्तरावरून नागरिकांना सतर्क करण्यात आले आहे. पण गेल्या 2 दिवस पावसाने काहीसा नागरिकांना दिलासा दिला होता. शुक्रवारपासून पुढे 4 दिवस अतिवृष्टी होणार असल्याने सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. पण शुक्रवारी सकाळी पावसाची चांगलीच उघडीप पडली होती. अतिवृष्टीचा इशारा दिलेला असताना तसे वातावरणातही कोणते चिन्ह दिसत नव्हते. त्यामुळे सोशल मिडियावरून प्रशासनाच्यावतीने दिलेल्या अलर्टबाबत अनेक मिश्किल मेसेज व्हायरल करण्यात आले होते. पण दुपारी सारे आभाळ पावसाने दाटून येताच धुवाँधार पावसाला प्रारंभ झाला. सोसाटय़ाच्या वाऱयासह पावसाच्या जोरदार सरी पडल्या. त्यानंतर सायंकाळीही पुन्हा सुरू झालेल्या पावसाने रत्नागिरीत पाणीच पाणी करून टाकले. पावसाचा ऑरेंज अलर्ट कायम असल्याने नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन प्रशासनाने केले ओह.
चौकट…
जिल्ह्य़ातील नदींच्या पाणीपातळीत वाढ
जिल्हय़ात होत असलेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे येथील नद्यांच्या पाणीपातळीत चांगलीच वाढ झाली आहे. त्यामध्ये खेडमधील जगबुडी नदीची इशारा पातळी 6 मीटर असून सध्या 3.25 मी. आहे. चिपळूणमधील वाशिष्टी नदीची इशारा पातळी 5 मी.असून सध्या 2.3 मी. इतकी आहे. लांजातील काजळी नदीची इशारा पातळी 16.5 मी. इतकी असून सद्या 12.6 मी. आहे. राजापूरच्या कोदवली नदीची इशारा पातळी 4.9 असून सध्या 1.8 मी. इतकी आहे. संगमेश्वरच्या सोनवी, बावनदी, मुचकुंदी, शास्त्री या नद्यांच्याही पाणीपातळीत वाढ होत आहे.