वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोना महामारी समस्येच्या कडक नियमावलीमुळे आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने ऑलिंपिक विश्व पात्रता फेरी स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येत्या जुलै-ऑगस्ट दरम्यान होणाऱया टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत भारताच्या मुष्टीयोद्धय़ांच्या पथकांमध्ये नऊपेक्षा अधिक स्पर्धकांचा समावेश होण्याची शक्यता दुरावली आहे.
पॅरीसमध्ये येत्या जून महिन्यात आयोजित केलेली ऑलिंपिक पात्रतेसाठी अंतिम विश्व मुष्टीयुद्ध स्पर्धा कोरोना महामारीच्या कडक नियमावलीमुळे रद्द करण्याचा निर्णय आयओसीने घेतला आहे. या पात्रतेच्या अंतिम विश्व मुष्टीयुद्ध स्पर्धेसाठी 32 पुरूष आणि 21 महिला अशा एकूण 53 मुष्टीयोद्धय़ांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. पण आता ही स्पर्धा रद्द केल्याने आफ्रिका, अमेरिका, आशिया-ओसेनिया आणि युरोप या चार विभागातून विविध वजनगटात मुष्टीयोद्धय़ांची समान संख्या राहील. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या बॉक्सिंग टास्क फोर्सने दिलेल्या माहितीनुसार भारताचे अमीत पांघल (52 कि.), मनिष कौशिक (63 कि.), विकास कृष्णन (69 कि.), आशिषकुमार (75 कि.), सतीशकुमार (91 कि.वरील), एमसी मेरी कोम (51 कि.), सिमरनजीत कौर (60 कि.), बी.लवलिना (69 कि.) आणि पूजा रानी (75 कि,) हे मुष्टीयोद्धे ऑलिंपिक स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. भारताच्या अमीत पांघलने आपल्या 52 कि. वजनगटाच्या मानांकनात आघाडीचे स्थान मिळविले आहे.