मुंबई \ ऑनलाईन टीम
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने इतिहास रचला असून कांस्यपदक मिळवलं आहे. तब्बल ४१ वर्षांनी भारताने हॉकीमध्ये पदक मिळवलं असून सुवर्णअक्षरात लिहिलं जाईल अशी कामगिरी केली आहे. भारताने बलाढ्य अशा जर्मनीचा ५-४ फरकाने पराभव केला आणि कांस्यपदकावर नाव कोरलं. भारतीय संघावर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या ऐतिहासिक कामगिरीबद्दल भारतीय संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग सोबत फोनवर बोलून शुभेच्छा दिल्या. तसेच ट्विट करत हा ‘नवा भारत’ असल्याचं म्हटलंय. यावरूनच राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे.
“ऑलिम्पिकसाठी गेलेल्या भारतीय चमूत ४०% पंजाबी आणि हरियाणवी आहेत. त्यांनी पराक्रम गाजवला तर भक्तांच्या मते ते कट्टर भारतीय आहेत. पण शेती कायद्यांना विरोध करणारे त्यांचे आईवडील देशद्रोही?” असे ट्विट नितीन राऊत यांनी केले आहे.
केंद्र सरकारने पारित केलेल्या तीन कृषी कायद्यांना पंजाब आणि हरयाणातील शेतकरी मोठ्या प्रमाणात विरोध करत आहेत. यासाठी गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर आंदोलन देखील सुरू आहे. आंदोलन करणारे लोक हे शेतकरी नाहीत ते देशद्रोही आहेत, अशी टीका अनेक भाजप नेत्यांनी केली होती. आता भारतीय पुरुष संघाने कांस्यपदक पटकावल्यानंतर भाजपच्या या टीकेवरून नितीन राऊत यांनी निशाणा साधलाय.