ऑनलाईन टीम / सातारा :
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत तिरंदाजीमध्ये चांगली कामगिरी केलेल्या प्रवीण जाधवच्या कुटुंबियांना सरडे, ता. फलटण येथे घर बांधण्याच्या कारणावरुन गावातील काही गावगुंडांकडून दमदाटी आणि धमक्या देण्याचा प्रकार मागील काही दिवसांपासून सुरू आहे. गरीब कुटुंबातील प्रवीणने तिरंदाजीत देशपातळीवर नाव कमावले आणि सरडे गावाचे नाव प्रकाशझोतात आणले. मात्र, त्याच्या कुटुंबियांची या गावात होणारी अवहेलना आणि भितीपोटी या कुटुंबाने साताऱयातून बारामतीत स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आहे.
फलटण तालुक्यातील सरडे या गावात गावगुंडानी प्रवीणचे घर जेसीबीने उध्वस्त करण्याची धमकी दिली आहे. प्रवीणचे आजी, आजोबा शेतीमहामंडळात कामाला होते. नोकरी गेल्यानंतर शेती महामंडळाकडून आज ना उद्या राहायला घर मिळेल या आशेवर प्रवीणचे वडील शेती महामंडळाच्या जागेत पाल टाकून रहात होते. महामंडळातील तत्कालीन अधिकाऱ्याच्या तोंडी सांगण्यावरुनच हे पाल टाकण्यात आले होते. प्रवीणचे वडील रमेश आणि आई हे दोघेही मजुरी करतात. प्रवीण खेळात चपळ होता, शिक्षकांनी ते हेरलं आणि प्रविणला मिळालेल्या मार्गदर्शनावर तो आज या ऑलिम्पिकपर्यंत पोहोचला.
दरम्यान, प्रवीण सैन्यदलात भरती झाल्याने तो जमेल तसे पैसे आईवडीलांना पाठवत होता. त्यामधून आई-वडीलांनी दोन खोल्यांचे बांधकाम केले. या घराशेजारील शेती महामंडळाच्या जागेत प्रवीणने एका बंगलावजा घराचे सुरू केले. पाया खोदून इतर साहित्यही आणले. मात्र, गावगुंडांनी शेताकडे जाण्यास रस्ता नसल्याचे कारण देत बांधकाम बंद पाडले. त्यावर पोलिसांनी मध्यस्थी करुन हा वाद संपुष्टात आणला होता. पुन्हा गावगुंडांनी घर बांधल्यास ते जेसीबीने पाडण्याची धमकी दिली. सततच्या धमक्या आणि दमदाटीच्या प्रकारांमुळे प्रवीणचे कुटुंब जेरीस आले आहे. त्यामुळे या कुटुंबाने सातारा जिल्हा सोडण्याचा निर्णय घेतला आहे.