ऑनलाईन टीम / सातारा :
टोकियो ऑलिम्पिकमध्ये तिरंदाजीत चांगली कामगिरी करणाऱ्या प्रवीण जाधवच्या कुटुंबियांना सरडे, ता. फलटण येथे घर बांधण्यावरुन गावातील काही गावगुंडांकडून दमदाटी आणि धमक्या देण्याचा प्रकार काही दिवसांपासून सुरू होता. त्यामुळे प्रवीणच्या कुटुंबियांनी गाव सोडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, पोलीस प्रशासनाने या गावगुंडाना समज देत हा वाद संपुष्टात आणला आहे. यापुढे प्रवीणच्या कुटुंबियांना कोणताही त्रास होणार नसल्याचे संबंधितांनी सांगितले आहे. त्यामुळे प्रवीणच्या कुटुंबाचा वादाचा प्रश्न आता निकाली निघाल्याचे गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी आज स्पष्ट केले.
प्रवीणचे आजी, आजोबा शेतीमहामंडळात कामाला होते. नोकरी गेल्यानंतर शेती महामंडळाकडून आज ना उद्या राहायला घर मिळेल या आशेवर प्रवीणचे वडील शेती महामंडळाच्या जागेत पाल टाकून रहात होते. महामंडळातील तत्कालीन अधिकाऱयाच्या तोंडी सांगण्यावरुनच हे पाल टाकण्यात आले होते. प्रवीणचे वडील रमेश आणि आई हे दोघेही मजुरी करतात. प्रवीण खेळात चपळ होता, शिक्षकांनी ते हेरलं आणि प्रविणला मिळालेल्या मार्गदर्शनावर तो आज या ऑलिम्पिकपर्यंत पोहोचला.
दरम्यान, प्रवीण सैन्यदलात भरती झाल्याने तो जमेल तसे पैसे आईवडीलांना पाठवत होता. त्यामधून आई-वडीलांनी दोन खोल्यांचे बांधकाम केले. या घराशेजारील शेती महामंडळाच्या जागेत प्रवीणने एका बंगलावजा घराचे काम सुरू केले. पाया खोदून इतर साहित्यही आणले होते. मात्र, गावगुंडांनी शेताकडे जाण्यास रस्ता नसल्याचे कारण देत बांधकाम बंद पाडले. त्यावर पोलिसांनी मध्यस्थी करुन हा वाद संपुष्टात आणला होता. मात्र, पुन्हा गावगुंडांनी घर बांधल्यास ते जेसीबीने पाडण्याची धमकी दिली. सततच्या धमक्या आणि दमदाटीच्या प्रकारांमुळे प्रवीणचे कुटुंब जेरीस आले आहे. त्यामुळे या कुटुंबाने साताऱयातून बारामतीला शिफ्ट होण्याचा घेतला होता. त्यावर पुन्हा पोलीस प्रशासनाने मध्यस्थी करत हा वाद संपुष्टात आणला. प्रवीण जाधवने आज लिहून दिले आहे की, माझी कोणाविषयी तक्रार नाही.