वृत्तसंस्था /नवी दिल्ली
आगामी टोकियो ऑलिम्पिकसाठी भारताचे पथक 100 ऍथलिटस्सह 190 सदस्यांचे असेल, असे भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र बात्रा गुरुवारी म्हणाले. क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी भारतीय ऑलिम्पियनसाठी सुसज्ज ऑलिम्पिक किटचे अनावरण केले, त्यानंतर बात्रा बोलत होते.
यंदाच्या ऑलिम्पिकसाठी आतापर्यंत 100 भारतीय ऍथलिट्सनी पात्रता संपादन केली असून यात 56 पुरुष व 44 महिला स्पर्धकांचा समावेश आहे. आणखी 25 ते 35 भारतीय क्रीडापटू स्पर्धेसाठी पात्रता मिळवतील, असा भारतीय ऑलिम्पिक संघटनेचा अंदाज आहे.
यंदा भारतीय पथक दुपटीने पदके जिंकेल, असा विश्वास बात्रा यांनी याप्रसंगी व्यक्त केला. भारताची सर्वोत्तम कामगिरी 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये असून त्यात 2 रौप्य व 4 कांस्य अशी 6 पदके पथकाने जिंकली होती. अलीकडे कोरोनाची बाधा झाली, असे मोजके अपवाद वगळता पथकातील ऑलिम्पिक-पात्र सर्व ऍथलिटना पहिली लस दिली असल्याचे बात्रा यांनी यावेळी सांगितले. क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी भारतीय पथकाला शुभेच्छा देत पंतप्रधानांनी तयारीचा पूर्ण आढावा घेतला असल्याचे नमूद केले.
या छोटेखानी कार्यक्रमाप्रसंगी ऑलिम्पिक-पात्र नीरज चोप्रा, बजरंग पुनिया, रवी दाहिया, सुमीत मलिक, सीमा बिस्ला व भारतीय पथकाचे प्रमुख बी. पी. बैश्या, उप-प्रमुख प्रेमचंद वर्मा उपस्थित होते.