ऑनलाईन टीम / भुवनेश्वर :
ओडिशातील केंद्रपाडा जिल्ह्यातील गहिरमाथा येथील ‘नासी – २’ बेट आणि ऋषिकुल्यच्या समुद्र किनारी मागील महिनाभरात दोन कोटींपेक्षा जास्त ‘ऑलिव्ह रिडले’ या कासवांच्या पिल्लांनी अंड्यातून बाहेर पडून समुद्राकडे धाव घेतली. ओडिशातील राजनगर खारफुटी वन विभागाचे विभागीय वन अधिकारी विकास रंजन दास ही माहिती दिली आहे.
दास म्हणाले, गहिरमाथा आणि ऋषिकुल्य हा किनारा ‘ऑलिव्ह रिडले’ कासवांच्या प्रजननासाठी प्रसिद्ध आहे. मे महिन्याच्या दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात ‘ऑलिव्ह रिडले’ कासवांनी घातलेल्या अंड्यांतून दोन कोटी पिल्ले बाहेर पडली आहेत. या कासवांच्या प्रजनन हंगाम आता संपला आहे.
या कासवांच्या अंडी उबवण्याचे प्रमाण यंदा 70 % होते. या पिल्लांचे इतर वन्यप्राणी आणि मानवापासून रक्षण करण्यासाठी वनविभागाने ऋषिकुल्य किनाऱ्यावर पाच किलोमीटरपर्यंत धातूच्या तारेचे कुंपण घातलेले आहे. त्यामुळे कोणत्याही अडथळ्यांशिवाय ही पिल्ले समुद्रकिनाऱ्यापर्यंत पोहचली.