भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांचे प्रतिपादन
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
या वर्षातील दुसऱया टप्प्यात नियोजित ऑस्ट्रेलिया दौऱयात 4 ऐवजी 5 कसोटी सामने खेळण्याचा प्रस्ताव क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिला असला तरी प्रत्यक्षात आताच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे तो अंमलात आणणे अशक्य आहे, असे स्पष्ट प्रतिपादन भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी केले. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये बोर्डर-गावसकर चषक स्पर्धा होणे अपेक्षित असून त्या पार्श्वभूमीवर गांगुली बोलत होते. एरवी ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेत 4 सामने खेळवले जातात. पण, या मालिकेसाठी 4 ऐवजी 5 कसोटी सामने खेळावेत, असा क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा प्रस्ताव आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीईओ केव्हिन रॉबर्ट्स यांनी भारताविरुद्ध 5 कसोटी सामने खेळवले जावेत, याबद्दल आपले प्रयत्न सुरु असल्याचे यापूर्वी म्हटले होते. पण, कोव्हिड-19 च्या महासंकटामुळे खूपच प्रतिकूल स्थिती आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाशी आपल्या मंडळाचा उत्तम स्नेह असल्याने त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा आहे, असे रॉबर्ट्स यापूर्वी म्हणाले हेते. ‘वर्षाच्या उत्तरार्धात ऑस्ट्रेलियातील परिस्थिती कशी असेल, यावर देखील बरेच काही अवलंबून असेल. पण, आमची पावले योग्य दिशेने असून यामुळे आम्हाला आशाअपेक्षा आहेत’, याचा त्यांनी येथे उल्लेख केला होता.
‘ऑस्ट्रेलियात पाच कसोटी सामने खेळता येतील, असे मला वाटत नाही. त्या दौऱयात मर्यादित षटकांचे सामने होणार आहेत. शिवाय, 14 दिवसांच्या क्वारन्टाईन दिशानिर्देशाचे देखील पालन करावे लागणार आहे. यामुळे, दौऱयाचा कालावधी अर्थातच वाढणार आहे’, असे गांगुली म्हणाले.
आयसीसी नेतृत्वासाठी गांगुली सक्षम : डेव्हिड गॉवर
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीचे नेतृत्व भूषवण्यासाठी सौरभ गांगुली यांच्याकडे आवश्यक राजकीय कौशल्ये आहेत आणि बीसीसीआय अध्यक्षपदाची त्यापेक्षा अधिक कठीण जबाबदारी सहजपणे हाताळत याची त्यांनी चुणूकच दाखवून दिली आहे, असे माजी इंग्लिश कर्णधार डेव्हिड गॉवर यांनी नमूद केले.
‘भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा कारभार व्यवस्थिपणे चालवण्यासाठी काय कौशल्ये लागतात, हे मी सूक्ष्मपणे अभ्यासले आहे. प्रारंभी एक तरी गांगुलीप्रमाणे प्रतिष्ठित असणे आवश्यक असते आणि त्याही पेक्षा महत्त्वाचे म्हणजे तज्ञ राजकारणी देखील असावे लागते’, असे गॉवर म्हणाले.
‘आयसीसीचे अध्यक्षपद सांभाळणे सन्मानाचे आहे. पण, बीसीसीआयचा कारभार हाकणे त्यापेक्षा कित्येक पटींनी अधिक आव्हानात्मक आहे’, असे त्यांनी येथे नमूद केले. कसोटी क्रिकेट सर्वात महत्त्वाचा क्रिकेट फॉरमॅट असून त्यामुळे वर्ल्ड कसोटी चॅम्पियनशिप विशेष महत्त्वाची ठरते, असे ते शेवटी म्हणाले.