वृत्तसंस्था/ मुंबई
सुनील जोशी यांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती ऑस्ट्रेलिया दौऱयासाठी पुढील आठवडय़ात भारतीय संघनिवड करणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया व बीसीसीआय यांनी या दौऱयाच्या कार्यक्रमास जवळपास मान्यता दिली असल्याने निवड समितीला संघनिवड करण्यास सांगण्यात आले आहे.
काही आठवडय़ांपासून दोन्ही मंडळांनी बरीच चर्चा केल्यानंतर 27 नोव्हेंबरपासून 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेला सुरुवात करण्यास मान्यता दिली आहे. त्यानंतर 3 वनडे सामन्यांची मालिका 3 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. चार कसोटींची मालिका 17 डिसेंबर रोजी ऍडलेडमध्ये डे-नाईट कसोटीने सुरू होण्याची शक्यता आहे. या दौऱयावर पाठविल्या जाणाऱया संपूर्ण पथकाचा (खेळाडू, कोचिंग स्टाफ, साहाय्यक स्टाफ व कुटुंबीय) पूर्ण तपशील बीसीसीआयकडून सीएने मागविला असल्याचे समजते. त्यामुळे निवड समितीला संघनिवड करण्याचे काम पुढील आठवडय़ात करण्यास सांगण्यात आले आहे. या मालिकेतील सामन्यांची ठिकाणे येत्या पंधरवडय़ात निश्चित करण्यात येणार असल्याचे सीएने बीसीसीआयला कळविले आहे.
बीसीसीआयची वार्षिक बैठक कोरोना महामारीमुळे स्थगित झाल्याने 30 सप्टेंबर रोजी मुदत संपलेल्या तीन सदस्यांनाच संघनिवड करण्यास सांगण्यात येणार आहे. कसोटी स्पेशालिस्ट असलेले पुजारा व विहारीसारखे खेळाडू प्रशिक्षक स्टाफ ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवडय़ात संयुक्त अरब अमिरातकडे रवाना होणार आहेत. भारतीय संघ यूएईमधून दोन टप्प्यात ऑस्ट्रेलियाकडे प्रयाण करणार आहे. यातील पहिली तुकडी 4 नोव्हेंबरला दुबईहून रवाना होईल आणि ज्यांचे संघ आयपीएल प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत, ते खेळाडू 11 नोव्हेंबरला ऑस्ट्रेलियास रवाना होणार आहेत.