वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱयावर जाण्यासाठी 3 आठवडय़ाचा अवधी बाकी असला तरी संघनिवडीबाबत अद्याप कोणतीही हालचाल होताना दिसत नाही. मात्र ही निवड पुढील आठवडय़ात केली जाण्याची शक्यता असल्याचे मानले जात आहे.
नवीन निवड समिती नियुक्त होण्याआधी विद्यमान निवड समितीचे हे शेवटचे काम असणार आहे. त्यांना आठवडाभरात बैठकीसाठी बोलावणे जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या दौऱयाचे तात्पुरते वेळापत्रक तयार केले असून अंतिम मान्यतेची प्रतीक्षा केली जात असल्याचे बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी सांगितले आहे. ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड राज्याने या वेळापत्रकाला अद्याप मंजुरी दिली नसल्याने हा विलंब होत असल्याचे सांगण्यात आले.
भारतीय संघ सुमारे अडीच महिन्याच्या या दीर्घ दौऱयात कसोटी, वनडे व टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांची पूर्ण मालिका खेळण्याची अपेक्षा सीएने केली आहे. याशिवाय भारतीय संघाकडून कोव्हिड 19 ची नियमावली काटेकोरपणे पाळली जावी, असेही त्यांना वाटते. भारतीय संघासाठी 14 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी ठेवण्यात आला आहे. मात्र भारताला हा कालावधी कमी केला जावा, असे वाटत आहे. पण सीएने त्यांची ही मागणी फेटाळून लावली आहे. तसेच क्वीन्सलँडने गोल्ड कोस्टमध्ये सामने ठेवण्याची मागणीही केली आहे. याचा विचार करता भारतीय संघ 12 नोव्हेंबरपर्यंत ऑस्ट्रेलियात दाखल होण्याची अपेक्षा आहे. केवळ 23 दिवसांचा अवधी असताना आणि आयपीएलनंतर लगेचच संघ ऑस्ट्रेलियाला प्रयाण करणार असेल तर संघनिवड केव्हा होणार? असे प्रश्न विचारले जात आहेत. मंजुरी मिळाल्यानंतर अंतिम वेळापत्रक ऑस्ट्रेलियाने ते जाहीर केल्यावर लगेचच भारतीय संघाची निवडही केली जाईल, असे मानले जात आहे.