कामाच्या दर्जाबाबत काँग्रेसच्या रॉयला फर्नांडिसकडून सवाल
प्रतिनिधी / मडगाव
ओडली येथील तलावाच्या विध्वंसास सरकार जबाबदार असल्याचा आरोप बाणावलीतील काँग्रेसच्या स्थानिक नेत्या रॉयला फर्नांडिस यांनी केला आहे. येथील तलावाच्या ठिकाणी पदपथ उभारण्यासाठी सल्लागारांच्या अहवालानंतर गोवा पायाभूत साधनसुविधा विकास महामंडळाने या प्रकल्पाला मंजुरी दिली आणि नंतर कामासाठी निविदा काढल्या. मात्र पहिल्याच पावसाच्या सरींनी या पदपथ?ाच्या संरक्षक भिंतीच्या कामाला तडे जाऊन ते कलंडले असल्याने या कामाच्या दर्जाबाबत फर्नांडिस यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
अशा निष्कृष्ट दर्जाच्या कामासाठी करदात्यांच्या पैशांचा अपव्यय झाल्यास त्यास पूर्णता सरकार जबाबदार राहील, असे फर्नांडिस यांनी म्हटले आहे. या प्रकल्पाची रचना करताना जैवविविधता आणि पर्यावरणाचे महत्त्व लक्षात घेण्यात शासन आणि संबंधित विभागांना अपयश आल्याची टीका त्यांनी केली आहे. बाणावलीत सुरू असलेली काही विकासकामे सदर सल्लागार एजन्सीच्या सल्ल्यानुसार केली जात असल्याने त्या सल्लागाराद्वारे करण्यात आलेल्या अभ्यासाच्या सत्यतेबद्दल चौकशी होण्याची आवश्यकता फर्नांडिस यांनी व्यक्त केली आहे. सुमारे 2.5 कोटी रु. खर्चून सदर प्रकल्पाची उभारणी करण्यात येत होती अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, यावर गोवा फॉरवर्डचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत यांनीही प्रतिक्रिया व्यक्त करताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजपाचा हा विकास मॉडेल असून त्याअंतर्गत आधी तडे गेलेले पाहायला मिळतील व नंतर ते कोलमडून पडेल, असे म्हटले आहे.