दोन राज्यांमध्ये एनडीआरएफच्या आतापर्यंतची सर्वाधिक पथके तैनात
वृत्तसंस्था / भुवनेश्वर
यास चक्रीवादळ बुधवारी सकाळी ओडिशाच्या भद्रक जिल्हय़ातील धमरानजीक धडकण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये याला सामोरे जाण्याची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. एनडीआरएफने ‘यास’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंतची सर्वाधिक पथके तैनात केली आहेत. असुरक्षित ठिकाणांहून लोकांना मदत शिबिरापर्यंत नेण्यात येत आहे. याचबरोबर नियंत्रण कक्षातून स्थितीवर नजर ठेवली जात आहे.
ओडिशाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक वाय.के. जेठवा यांना राज्याच्या किनारी जिल्हय़ांमध्ये पोलीस पथकांनी स्थलांतर मोहीम गतिमान केल्याचे सांगितले आहे. आतापर्यंत 81,661 लोकांना संवेदनशील क्षेत्रांमधून बाहेर काढून मदत शिबिरांमध्ये पाठविण्यात येत आहे. चक्रीवादळानंतर मदत आणि बचावासाठी राज्याच्या आपत्ती त्वरित कृती दलाच्या 60 पथकांना तैनात करण्यात आले आहे. राज्य सशस्त्र पोलिसांच्या 55 तुकडय़ा याप्रकरणी त्यांना सहाय्य करतील असे जेठवा यांनी म्हटले आहे.
तर पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही सातत्याने नियंत्रण कक्षातून स्थितीवर नजर ठेवून आहेत. ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी या वादळाला सामोरे जाण्यासाठीच्या तयारीचा आढावा घेतला आहे. यास वादळासंबंधी सर्व जिल्हाधिकाऱयांशी चर्चा केली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
यास चक्रीवादळ बुधवारी सकाळी ओडिशाच्या भद्रकमध्ये धमरा आणि चांदबाली दरम्यान धडकण्याची शक्यता आहे. यास मंगळवार संध्याकाळपर्यंत अत्यंत भीषण चक्रीवादळात रुपांतरित होण्याची आणि चांदबालीत सर्वाधिक नुकसान होण्याची शक्यता आहे. चक्रीवादळ धडकण्यापूर्वीचे 6 तास आणि नंतर याचा गंभीर परिणाम दिसून येऊ शकतो अशी माहिती हवामान खात्याचे महासंचालक डॉ. मृत्युंज महापात्र यांनी दिली आहे.
एनडीआरएफने 5 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश अंदमान-निकोबार बेटसमुहात तैनात करण्यासाठी एकूण 112 पथकांना सज्ज ठेवले आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱया या चक्रीवादळामुळे हे भाग प्रभावित होण्याची शक्यता आहे. ओडिशात सर्वाधिक 52 आणि पश्चिम बंगालमध्ये 45 पथकांना तैनात करण्यात आले आहे. याचबरोबर आंध्रप्रदेश, तामिळनाडू, झारखंड आणि अंदमान आणि निकोबार बेटसमुहात उर्वरित पथकांना तैनात करण्यात आले आहे.