जिल्हा न्यायालयानजिकची दुर्घटना, एक जण गंभीर
प्रतिनिधी/ सातारा
साताऱयातून कोल्हापूरला मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास कारमधून निघालेल्या तीन युवकांची कार साताऱयातील जिल्हा सत्र न्यायालयानजीक असलेल्या ओढय़ात 30 फूट खोल खड्डयात कोसळल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात कोल्हापूरचे 2 जण ठार झाले तर एक जण जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ओढय़ाच्या पुलाचा कठडा ओलांडून कार ओढय़ात कशी गेली याबाबत चर्चा सुरु आहे. अनिकेत राजेंद्र कुलकर्णी (वय 23, रा. मंगळवार पेठ, कोल्हापूर), आदित्य घाटगे (वय 23, रा. कसबा बावडा, दोघे रा. कोल्हापूर) अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. तर देवराज माळी (वय 21, रा. कसबा बावडा) असे जखमी युवकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, साताऱयातून अनिकेत कुलकर्णी याच्यासह त्याचे दोन मित्र कोल्हापूरला कारमधून रात्री उशिरा एक वाजण्याच्या सुमारास निघाले होते. तिघेही कारमधून भरधाव वेगाने कोल्हापूरला जाण्यासाठी राजपथावरुन पोवई नाका, पोवई नाक्यावरुन भरधाव वेगाने पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या दिशेने चालले होते. कार अनिकेत चालवत होता. जिल्हा न्यायालयाच्या इमारतीलगत असलेल्या ओढय़ाच्या जवळ ही कार थेट ओढय़ात कोसळल्याचा रात्री जोरात आवाज झाला. वास्तविक रात्री हा रस्ता सुनसान असल्याने या अपघाताकडे लगेच कोणाचे लक्ष गेले नाही. कार 30 फुट ओढय़ात गेल्याने काही सातारकरांनी पाहताच लगेच पोलिसांना कळवून रात्रीच त्या कारमध्ये असलेल्या बाहेर काढण्याचे प्रयत्न केले. तेव्हा कारमधील अनिकेत कुलकर्णी, आदित्य घाटगे, देवराज माळी हे तिघे प्रवास करत होते. तिघांपैकी अनिकेत याचा जागीच मृत्यू झाला तर अदित्य घाटगे याचा रुग्णालयात दाखल करताना मृत्यू झाला. देवराज माळी याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
क्रेनने बाहेर काढली कार
कार ओढय़ात कोसळल्यानंतर रात्री ती बाहेर काढता आली नाही. सकाळी क्रेनच्या मदतीने ती कार बाहेर काढण्यात आली. कारच्या पुढची बाजू खराब झाली आहे. नेमका कसा अपघात झाला हे समजू शकले नाही.